रत्नागिरीतील कुणबीभवनमध्ये पार पडला विशाल कळंबटे-निलम थुळ दाम्पत्याचा विवाह : सोहळय़ात समतावादी, विज्ञानवादी विचारांचे आचरण
प्रतिनिधी / रत्नागिरी
समाजात परिवर्तनातून महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करून सत्य, निर्मळ, समतावादी व विज्ञानवादी विचारांचे आचरण करण्याची शपथ घेत रत्नागिरीत ‘सत्यशोधक शिवविवाह’ संकल्पना रुजू लागली आहे. रत्नागिरीत नुकताच विशाल वीणा विजय कळंबटे (झरेवाडी, रत्नागिरी) आणि निलम सुवर्णा श्रीधर थुळ (रा. मावळंगे) यांचा आगळावेगळा सत्यशोधक सोहळा पार पडला. यावेळी या दाम्पत्याने ‘ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी’ असा संदेशाचा फलक घेऊन जागृतीचा संदेश दिला.
हा आगळावेगळा सत्यशोधक शिवविवाह नुकताच रत्नागिरीतील लोकनेते शामरावजी पेजे सभागृहात संपन्न झाला. समाज परिवर्तन घडविण्यासाठी युवा पिढी पुढे येत आहे. या पिढीने विज्ञानवादी विचारांची कास धरली आहे. या सोहळय़ात ना बँडबाजा, ना धार्मिक कार्यक्रम, याशिवाय अवांतर खर्चाला फाटा देत काही मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करून सत्य, निर्मळ, समतावादी व विज्ञानवादी विचारांचे आचरण करण्याची शपथ घेत विशाल विणा विजय कळंबटे (मु. पो. झरेवाडी, हातखंबा ता. जि. रत्नागिरी) व निलम सुवर्णा श्रीधर थुळ (मु. पो. मावळंगे, ता. जि. रत्नागिरी) हे सत्यशोधक शिवविवाह सोहळय़ात बांधले गेले.
कोकणचे गाडगेबाबा, प्रबोधनकार मारूतीकाका जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. वधु-वरांनी महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्वागत गीत व जिजाऊ वंदना अमृता गोरिवले, अपेक्षा गोरिवले आणि अंतरा गोरिवले यांनी सादर केली. काकांचे सहकारी विलास डिके, मिलिंद काडवईकर, विष्णू खापरे व प्रा. संदीप येलये यांनी ’शिवपंचके’ सादर केली. वधु-वरांनी शपथ घेऊन समतावादी व विज्ञानवादी विचारांचे आचरण करण्याची ग्वाही देऊन या विवाहाचा विधी अनोख्या पध्दतीने मारूती काका जोशी, गणपत भायजे, विलास डिके व मिलिंद कडवईकर यांनी पार पाडला.
या विवाह सोहळ्याला ’अंनिस’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, रत्नागिरी पंचायत सामितीच्या सदस्या साक्षी रावणांग, रत्नागिरी जिल्हा ’अंनिस’चे संघटक वाय. डी. पवार, आधार सामाजिक संस्थेचे सचिव विलास डिके, युगपरूष सम्राट बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत भायजे, मिलिंद कडवईकर, कुणबी युवा, शाखा चिपळूणचे उपाध्यक्ष प्रा. संदीप येलये, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा रत्नागिरीचे सचिव संतोष रावणांग, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा संगमेश्वरचे सचिव संतोष चांदे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा संगमेश्वरचे सहसचिव विष्णू खापरे, शिल्पा येलये, शंकर लाड, मधुकर थुळ, श्रीधर थुळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले.