ऑनलाईन टीम / मुंबई :
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली.
नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे, असे असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाच आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरे. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचे आत्मचिंतन करावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.