हलशी येथे शिव व्याख्याते सौरभ करंडे यांचे व्याख्यान
वार्ताहर / नंदगड
सध्याची परिस्थिती पाहता शिवकार्याने प्रेरित झालेली पिढी घडविणे आवश्यक असून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचल्याने जगण्याचा मार्ग मिळतो. प्रत्येकाने शिवचरित्र वाचावे, असे प्रतिपादन पुणे येथील शिव व्याख्याते सौरभ करंडे यांनी केले.
हलशी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेतील 1995-96 मधील इयत्ता सातवीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सोमवारी पार पडला. यावेळी जाहीर व्याख्यानात करंडे म्हणाले, 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अन्यथा देशाचा वर्तमान बदलून गेला असता. स्वराज्य म्हणजे तुमचे-माझे घर असून स्वराज्यासाठी मावळय़ांचा त्याग महत्त्वाचा आहे. राजांचा पोषाख घालून शिवा काशीदने स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. तर तुझ्या भाकरीपेक्षा राजांची चाकरी बरी असे म्हणत, अनेक मावळे लढत राहिले. मावळय़ांच्या योगदानात त्यांच्या आई-बहिणी व त्यांच्या पत्नींचाही तितकाच मोठा वाटा आहे. पुरुषच नव्हे तर स्त्रियाही स्वराज्यासाठी लढल्या. राजे कोणत्याही प्रकारचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करीत होते.
गडकोट मोहिमेत सहभागी होऊन राजांचा इतिहास समजून घ्या
राज्याभिषेकावेळी स्वतंत्र मराठी भाषेसाठी राज्य व्यवहार कोष तयार केला. नशीब नेहमीच शुरांना साथ देत असते. साधूसंतांनी केलेली भक्ती म्हणजे शिवाजी राजे होते. 350 वर्षांपूर्वी शाहिस्तेखानाची बोटे छाटून शिवाजी महाराजांनी पहिला सर्जिकल घडविला होता. शिवाजीराजे म्हणजे स्वाभिमान आहे. बेळगावातील दुर्गामाता दौड सर्वांसाठी प्रेरणादायी असून गडकोट मोहिमेत सहभागी होऊन राजांचा इतिहास समजून घ्यावा, प्रत्येक घरातील मुलांना शिवाजी राजांची एक छोटीशी कथा ऐकवावी, त्यामुळे बराच बदल घडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी शाळेचे माजी मुख्याध्यापक आर. एल. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर पी. आर. पाटील, पी. जी. नंद्याळकर यांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर सुनील गुरव, नारायण भेकणे, संजय पवार, मऱयाप्पा पाटील, सरिता कणकुंबकर, सारिका तोलगेकर, सुनंदा अंग्रोळकर, दर्शना चौरी यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एम. एम. देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माजी मुख्याध्यापक एन. एल. पाटील, पी. बी. सराफ, कल्पना गाडगीळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तब्बल 25 वर्षांनंतर शाळेत पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाल्याने माजी विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.