प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांमध्ये घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. तरीदेखील रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांची संख्या कमी झाली नाही. शिवाजी रोड परिसरात कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याची योजना अपयशी ठरली असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील नागरिकांकडून घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. पण नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कचरा जमा करण्यासाठी महापालिकेकडून कोटय़वधीच्या निविदा काढून कंत्राटदार नियुक्त केले आहेत. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी कामगार नियुक्त केले आहेत. सदर स्वच्छता कामगार कचरा घेण्यासाठी कचरावाहू वाहन घेऊन घरोघरी जातात. पण काही नागरिक तसेच व्यावसायिक स्वच्छता कामगारांकडे कचरा देत नाहीत. मात्र, काही वेळानंतर घरातील कचरा रस्त्याशेजारी किंवा नाल्याशेजारी टाकतात. शिवाजी रोड परिसरात नाल्याशेजारी कचरा टाकण्यात येत असल्याने कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे रस्त्याशेजारी कचरा टाकण्याऐवजी घरी येणाऱया स्वच्छता कामगारांकडे तो देण्यात आल्यास शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा हातभार लागू शकतो. पण कचरा रस्त्याशेजारी टाकण्यात आल्याने तो पसरून अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण करण्यास काही नागरिकच जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे.