कॉलेज सुरु, परीक्षेसंदर्भात नियोजन नसल्याने संभ्रमावस्था कायम, निकालातील त्रृटींमुळे परीक्षा अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना अडचणी
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये सुरु झाली, परंतू पहिली सेमिस्टर घ्यायची की नाही याबद्दल संभ्रमावस्था आहे. वर्षभरात एकच परीक्षा घ्यावी, अशी प्राचार्य असोसिएशनची मागणी आहे. परंतू युजीसी व अधिकार मंडळाचे नियम डावलून एकच परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी ग्राहÎ धरले जाणार का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने आवाहन केले खरे पण परीक्षा घ्यायची की नाही यासंदर्भात परीक्षा विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु केली. परंतू कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न सर्वच महाविद्यालयांसमोर उपस्थित झाला आहे. परीक्षा विभागाने परीक्षा अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे, परंतू काही विद्यार्थ्यांचे निकाल लागले नसल्याने अर्जच जनरेट होत नाहीत. पदवी प्रथम वर्षासाठीची लोकशाही निवडणूक ही परीक्षा सक्तीची असूनही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही. परीक्षा दिली तर उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यामुळे परीक्षा अर्ज भरता येत नाही. त्याचबरोबर बीकॉम व्दितीय व तृतीय वर्षाचे निकाल अद्याप लागलेले नाहीत.
त्यामुळे पुढच्या परीक्षेचा अर्ज कसा भरायचा, अशा अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागाने प्राचार्य संघटना किंवा प्राध्यापकांची परीक्षेसंदर्भात अद्याप बैठक घेतलेली नाही. परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यायची, किती अभ्यासक्रम ठेवायचा यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, महाविद्यालय आणि पालक यांच्यात संभ्रमावस्था कायम आहे.
विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देणार
कॉलेज आजपासून सुरू होण्यापूर्वीच परीक्षा अर्ज भरण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. परंतू अद्याप बी.कॉम व्दितीय व तृतीय वर्षाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज जनरेट होत नाहीत, त्यात परीक्षा अर्ज भरण्यासाठी फारच कमी कालावधी दिला आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या तसेच परीक्षा घ्यावयाची की नाही यासंदर्भात प्राचार्य, प्राध्यापकांची बैठक घ्या, या मागणीचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देणार आहे. – प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील (सचिव, कोल्हापूर जिल्हा प्राचार्य असोसिएशन )
परीक्षेसंदर्भात मंगळवारी निर्णय होईल
युजीसी आणि अधिकार मंडळाच्या नियमानुसार परीक्षा घेणे बंधनकारक आहे. पण या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षा किती गुणांच्या घ्यायची, अभ्यासक्रम किती कमी करायचा, परीक्षा किती तासाची असावी, यासंदर्भात मंगळवार 16 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून परीक्षा घेतल्या जातील.
डॉ. डी. जी. कणसे (अध्यक्ष, कणसे समिती)
अधिकार मंडळाच्या मान्यतेने परीक्षा घेतल्या जातील
सर्वच परीक्षांचे निकाल शनिवारी जाहीर केले आहेत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. प्राचार्यांच्या मागणीनुसार परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाईल. लवकरच कणसे समितीची बैठक घेऊन या समितीची परीक्षेसंदर्भातील शिफारस विद्यापरिषद व व्यवस्थापन परीषदेला केली जाईल. या दोन अधिकार मंडळाच्या मान्यतेने परीक्षेचे नियोजन केले जाईल. तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी युजीसीने नेमून दिलेल्या सर्वच परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. – गजानन पळसे (संचालक, परीक्षा व मूल्यमापण मंडळ, शिवाजी विद्यापीठ)
परीक्षा उत्तीर्ण नसल्याने पदवी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज रिजेक्ट
युजीसीच्या नियमानुसार पदवी प्रथम वर्षाला `लोकशाही प्रशासन व सुशासन’ हा विषय आहे. या विषयाची परीक्षा तृतीय वर्षापर्यंत कधीही देऊन उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परंतू काही विद्यार्थ्यांनी अद्याप ही परीक्षा दिलेली नाही, काहींनी दिली तर उत्तीर्ण झालेले नाहीत. तर काही महाविद्यालयांनी परीक्षाच घेतलेल्या नाहीत, त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज रिजेक्ट होत आहेत. तरी महाविद्यालयांनी परीक्षा घेऊन निकाल जाहीर केले पाहिजेत, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
परीक्षा, विद्यार्थी संख्या
कॉलेज : 290
परीक्षा : 624
परीक्षेला बसणारी मुले : 70 हजार