गुंतवणूकदारांना तीन दिवसात 9 लाख कोटींचे नुकसान
वृत्तसंस्था / मुंबई
देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामांबाबत आणि दूरसंचार कंपन्यांच्या थकीत एजीआरवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका यामुळे बुधवारी शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला. तीन वर्षांत प्रथमच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 29 हजारांच्या नीचांकी स्थरावर बंद झाला. या आठवडय़ाच्या प्रारंभी तीन व्यापारी दिवसात गुंतवणूकदारांना सुमारे 9 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स 1709.58 अंकांच्या मोठय़ा घसरणीसह 28,869.51 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 428.25 अंकांनी घसरून 8,468.80 अंकांवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारातील 28 कंपन्यांचे समभाग घसरणीच्या स्थरावर तर फक्त दोन कंपन्यांचे समभाग वधाराच्या स्थरावर बंद झाले. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजारातील सुमारे 44 कंपन्यांच्या समभागात खरेदी तर सहा कंपन्यांच्या समभागात विक्री पाहायला मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम बँकिंग कंपन्यांच्या समभागावर झाला. कारण या बँकांचे दूरसंचार कंपन्यांवर प्रचंड कर्ज आहे. याशिवाय काही आयटी कंपन्यांच्या समभागात किंचित वाढ दिसून आली.