मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर- आंदोलक शेतकऱयांनी दिल्ली किंवा हरियाणात जावे
वृत्तसंस्था/चंदीगड
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकार हे कायदे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शेतकरी स्वतःच्या आंदोलनावर ठाम आहेत. याचदरम्यान शेतकरी आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांचे आतापर्यंत समर्थन करत आलेले पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा सूर बदलताना दिसून येत आहे. आंदोलन सुरूच ठेवायचे असल्यास शेतकऱयांनी पंजाबऐवजी दिल्ली किंवा हरियाणात जावे असे कॅप्टननी सोमवारी आवाहन केले आहे.
शेतकरी आता देखील राज्यात 113 ठिकाणी निदर्शने करत आहेत. त्यांची ही निदर्शने आमच्या विकासाला प्रभावित करत असल्याचे अमरिंदर यांनी पंजाबच्या होशियारपूर जिल्हय़ातील मुखलियाना गावात एका शासकीय महाविद्यालयाच्या कामाच्या शुभारंभ सोहळय़ात बोलताना म्हटले आहे.
पंजाबच्या हिताचे नाही आंदोलन
पंजाबच्या शेतकऱयांना ही त्यांची भूमी असल्याचे सांगू इच्छितो. येथे सुरू असलेली निदर्शने राज्याच्या हिताची नाहीत. राज्यात निदर्शने करण्याऐवजी शेतकऱयांनी केंद्रावर कृषी कायदे रद्द करण्यासाठी दबाव निर्माण करावा असे अमरिंदर यांनी सांगितले आहे.
अकाली दल लक्ष्य बादल परिवार कृषी कायद्यांच्या विरोधात आता बोलत आहे, पण विधेयके तयार केली जात असताना शिरोमणी अकाली दलाचीही त्याकरता सहमती होती अशी टीका कॅप्टन यांनी केली आहे.