प्रतिनिधी/ बेंगळूर
भू-सुधारणा कायदा, एपीएमसी दुरुस्ती विधेयकांसह केंद्र सरकारच्या कृषीविषयक तीन धोरणांविरुद्ध राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शुक्रवारी राज्यात ‘रास्ता रोको, जेल भरो’ आंदोलन छेडले. केंद्र आणि राज्य सरकार भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवून शुक्रवारी अनेक शेतकरी संघटनांनी राज्यभरात महामार्ग, राज्य मार्गावर वाहने अडवून रास्ता रोको केला. बेंगळूरमध्ये म्हैसूर बँक सर्कलमध्ये निदर्शने करणाऱया शेतकऱयांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या एका अभिनेत्यालाही अटक करण्यात आली आहे. सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे.
बेंगळूर, म्हैसूर, चामराजनगर, मंडय़ा यासह सर्वच जिल्हय़ांमध्ये शेतकरी संघटना, कामगार संघटना, ऐक्य होराट समितीच्या नेतृत्वाखाली 35 हून अधिक संघटना आंदोलनामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झाल्या होत्या. काही ठिकाणी शेतकऱयांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले. त्यामुळे अनेक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. म्हैसूर, शिमोगा, चित्रदुर्ग, गुलबर्गा, गदगसह अनेक शहरांमध्येही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बेंगळूरमधील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर, ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष कुरबूर शांतकुमार, डॉ. राजकुमार अभिमानी संघाचे अध्यक्ष सा. रा. गोविंदू यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱयांनी बेंगळूरमधील विविध ठिकाणी आंदोलनाचे नेतृत्व सांभाळले.