कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी जिह्यातील शेतकऱयांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषि निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी कृषी विभागाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी खतांसह कृषी निविष्ठा शेतकर्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी संजय पाटील यांना नुकतेच दिले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे सर्व जिह्यांमध्ये असलेल्या संचारबंदीत शेतकर्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या समन्वयाने कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्यात यावा. कृषि सेवा केंद्रांवर शेतकऱयांची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे विषाणूचा फैलाव रोखणे शक्य होईल. अशी मागणी 30 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आणि कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
त्यानुसार खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी कृषी अधीक्षकांना नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर निवेदनातील मुद्यांवर चर्चा झाली होती. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी जिह्यातील शेतकर्यांना बियाणे, खते, कीटकनाशके त्यांच्या बांधा पर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन केले आहे. शेतकर्यांना बांधापर्यंत खते बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादी निविष्ठा मिळण्यासाठी शेतकर्यांनी त्यांच्या गटप्रमुखाकडे पीकनिहाय आवश्यक निविष्ठांची मागणी नोंद करणे अपेक्षीत आहे. निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखाणेच बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करावीत जेणेकरून सर्व शेतकर्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही. संबंधित गट आणि विक्री केंद्र यामध्ये समन्वयक म्हणून कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, यांना काम पाहण्याचे आदेश पत्रात देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱयांना आवश्यक निविष्ठा गावातच बांधापर्यंत उपलब्ध होतील असे जिल्हा पातळीवर नियोजन केले असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे.