नवी दिल्ली –
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून शनिवारी ‘चक्का जाम’ करण्याची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत शांततेच्या मार्गाने रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कोठेही तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. दरम्यान, या चक्काजाम आंदोलनातून दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये वगळण्यात आली आहेत. सध्या या राज्यांमध्ये केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशासनाला कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी निवेदने देण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकानंतरही नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता गाजीपूर सीमेवर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱयांना एक नवा फॉर्म्युला दिला आहे. प्रत्येक गावातून एक ट्रक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळे या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील, असे टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.