रेल्वे लाईन दुपदरीकरणासाठी शेतवडीतील रस्ता खराब केल्याने संताप
प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथे रेल्वे दुपदरीकरणासाठी अवजड वाहनांनी वाहतूक करून शेतवडीतील रस्ता खराब केल्याने मजगावच्या शेतकऱयांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला.
रेल्वे लाईन दुपदरीकरणाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. त्याकरिता मजगावातील शेतवडीला ये-जा करण्यासाठीचा डांबरी रस्ता संपूर्ण उखडून गेल्याने शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवजड साहित्याची वाहतूक केल्याने सदर रस्ता ठिकठिकाणी खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना शेताकडे ये-जा करणे कठीण झाले आहे.
शुक्रवारी सकाळी रेल्वेचे स्लिपर भरलेले टिप्पर रोखून ठेवल्यानंतर टिप्पर चालकांनी आपण काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतला. संबंधित कॉन्ट्रक्टरने सदर रस्त्याचे त्वरित खडीकरण करून पूर्वीप्रमाणे डांबरीकरण करून देऊनच वाहतूक सुरू करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱयांनी केली. यापूर्वीही सदर कॉन्ट्रक्टरला विनंती केली होती. परंतु न जुमानता रात्री अवेळी अवजड साहित्याची वाहतूक सुरूच ठेवली आहे. त्यामुळे सदर रास्ता रोको केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मजगावतील कृषी संघटक नेमू पाटील, देवेंद्र बस्तवाड, महावीर पुजारी, चंदू सातगौडा, माणिक सुप्पण्णावर, मधू पुजारी, राजू मुलीमनी, नमन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.