प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱयांना मारक ठरणारी विधेयके जारी करीत असल्याचा आरोप शेतकरी, कामगार संघटनांनी केला असून सोमवारी राज्यभरात निदर्शने करण्यात आली. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. धारवाड, रामनगर, रायचूर, बिदर, हासन, चिक्कबळ्ळापूर, बेंगळूर ग्रामीण, चामराजनगर, यादगीर, चित्रदुर्ग, हावेरी या जिल्हय़ांमध्ये कर्नाटक बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बेंगळूरमध्ये राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱयांनी टाऊन हॉलसमोर निदर्शने केली. काँग्रेससह इतर पक्षांनी देखील शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कर्नाटक बंदची हाक देण्यात आली तरी सोमवारी अनेक जिल्हय़ांमध्ये, शहरी भागात सर्व व्यवहार सुरळीत होते. मात्र, शेतकरी संघटनांचा मोर्चा, आंदोलनामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठांवर परिणाम झाला. अनेक भागात रस्ते बंद होते. याचा फटका सर्वसामान्यांना बसला.
शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सरकारने आपल्या मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी सरकारला दिला आहे. ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष कुरबूर शांतकुमार यांनी देखील सरकारने शेतकऱयांना मारक ठरणारी भू-सुधारणा दुरुसती विधेयक, एपीएमसी दुरुस्ती विधेयक व इतर विधेयके रद्द करावीत, अशी मागणी केली आहे.
राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये शेतकरी संघटनांबरोबरच इतर संघटनांचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले. यावेळी रास्ता रोको, धरणे आंदोलन, निदर्शने, मोर्चा काढण्यात आला, यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. बेंगळूरमध्ये शेतकऱयांनी खांद्यावर प्रतिकात्मक नांगर घेऊन धरणे आंदोलन छेडले. तर गदगमध्ये डोक्यावर दगड ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मंडय़ा शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या आंदोलनाला कन्नड संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. म्हैसूरमध्ये शेतकऱयांनी डोक्यावर दगड, खांद्यावर कुदळ, फावडा घेऊन मोर्चा काढला. तसेच बेंगळूरला जाण्याऱया बसेस अडविल्या.
यादगिरमध्ये शेतकरी व इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून सुभाषचंद्र बोस चौकामध्ये टायर्स पेटवून घोषणाबाजी केली. हुबळीतील चन्नम्मा सर्कलमध्ये रास्ता रोको करण्यात आला. चामराजनगरमध्ये भू-सुधारणा, एपीएमसी दुरुस्ती विधेयकाविरुद्ध धरणे आंदोलन छेडण्यात आले. येथे देखील अनेक संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला.
शेकडो कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
शेतकऱयांच्या आंदोलनावेळी अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत अनेकांना ताब्यात घेतले. बेंगळूरच्या के. आर. पुरम येथे मोर्चामध्ये सहभागी झालेले राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर, अखिल कर्नाटक रयत आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.