ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांचे स्वागत आहे. मात्र, शेतकऱयांचे नुकसान पाहता त्यांच्या हिताचेही निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केली.
शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केली.
ते म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. आपणदेखील त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत त्यांना सहकार्य केले पाहिजे. शेतकऱयांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने पावले उचलावीत. शेतकऱयांच्या बागायातीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारच्या भूमिकेमुळे भावही कोसळण्याची भीती आहे. हे पाहता शेतकऱयांपुढेही मदतीचा हात पुढे केला पाहिजे. तसेच शेतकऱयांना पीक कर्जाची परत तयार करणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे बँकांनी वसुलीसाठी त्यांच्या मागे लागू नये. तसेच कोणतीही कंपन्यांनी आपल्या कामगारांचे पगार कापू नयेत.
आपल्या राज्यात ज्या अत्यावशयक सेवा चालू आहेत, त्यांना अडवू नका. जे डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहे, त्यांना आपण घरी बसून सहकार्य केले पाहिजे. मीदेखील गेले काही दिवस घरातून बाहेर पडलेलो नाही. तुम्हीदेखील घरातून बाहेर पडू नका. सरकारच्या नियमांचे पालन करा, असे पवार यांनी सांगितले.