प्रतिनिधी / बेळगाव
अभिनेत्री कंगणा राणावत हिने शेतकऱयांना दहशतवादी म्हणून सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली आहे. हा संपूर्ण देशातील शेतकऱयांचा आणि जवानांचा अवमान आहे. त्यामुळे तिच्या विरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल केली असल्याची माहिती ऍड. हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
शेतकरीही आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. जे जाचक तीन कायदे आहेत ते रद्द करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. लोकशाही मार्गाने शेतकऱयांचा लढा सुरू असताना अभिनेत्री कंगणा राणावत हिने शेतकरी हे दहशतवादी आहेत, त्यांना देशामध्ये फूट पाडायची आहे, असे म्हणून शेतकऱयांच्या भावना दुखावल्या आहेत.
…तर न्यायालयात दावा
काही इंग्रजी माध्यमातून याबाबत तिची ही प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंगणा राणावत ही काही शेतकरी नाही. तिने शेतकऱयांविषयी बोलणे चुकीचे आहे. अर्धवट ज्ञान असलेल्या या अभिनेत्रीने गेल्या काही महिन्यांपासून काही बरळणे असे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे मी तिच्याबाबत तक्रार केली आहे. पोलिसांनी सध्या तक्रार लिहून घेतली आहे. मात्र अद्याप तिच्यावर गुन्हा दाखल केला नाही. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर न्यायालयात तिच्या विरोधात दावा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये सेक्शन 153, 153(ए), 503, 504, 505(1), 505(बी), 505(सी), 505(2), 506 अन्वये तक्रार देण्यात आली आहे. तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यापुढे अशा प्रकारे शेतकऱयांवर अथवा इतरांवर कोणत्याही प्रकारे वक्तव्य करू नये, असेही या तक्रारीत म्हटल्याचे ऍड. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.