ऑनलाईन टीम / मुंबई :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ मिळू शकणार आहे.
सहकार आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. यंदा मात्र खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषीमंत्री भुसे यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जवाटपाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यतील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरित करावे आणि त्याद्वारे त्यांना एटीएममधून रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.