या हंगामातील पहिल्या टप्प्यातील एकंदरीत कामगिरी पाहता, चेन्नई सुपरकिंग्सचा संघच रसातळाला फेकला गेला होता आणि साखळी फेरीअखेर तेच शेवटच्या स्थानी कायम राहणार, असेच संकेत होते. पण, अचानक धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सने जणू राखेतून फिनीक्स झेप घेतली आणि पाहता पाहता गुणतालिकेत अनेक समीकरणांची उलथापालथ सुरु झाली. काहीच दिवसात चेन्नईने आव्हान संपुष्टात आल्यानंतर नैसर्गिक खेळावर भर दिला आणि एकापाठोपाठ एका विजयाचा धडाकाच लावला. यानंतर चेन्नईचा संघ कधी सातव्या स्थानी पोहोचला आणि कधी राजस्थानचा संघ आठव्या स्थानी, रसातळाला फेकला गेला, ते कळालेही नाही. अर्थात, राजस्थानच्या या निराशाजनक कामगिरीचा सोशल मीडियावर बराच समाचार घेतला गेला.
एक युजर म्हणाला, युएईमधून आज एक विमान चेन्नईच्या दिशेने झेपावेल आणि त्याचा मार्ग मोहाली, जयपूर असा असेल. एका चाहत्याने राजस्थानला का पराभव स्वीकारावा लागला, त्याची कारणमीमांसा केली. तो म्हणाला, आर्चरला एकापेक्षा अधिक बळी घेता आले नाहीत, मॉर्गनला शेवटच्या काही षटकात हाणामारीची संधी दिली गेली, ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिले आणि एकही मोठी भागीदारी झाली नाही.