आज-काल सर्व काही इन्स्टंट पाहिजे असलेल्या काळात आणि त्यातही ट्वेंटी – ट्वेंटीचे सामने प्रिय होत असणाऱया काळात नितीन गडकरी हे काय अप्रिय बोलून बसले? चांगली दणकट खेळणी आता लहान मुलांनाही आवडत नाहीत. तिथे गडकरी चांगले, दणकट विचार देत आहेत. चकचकीत दिसणारी, गुळगुळीत भासणारी चायनीज खेळणी मुलांना आवडतात. भले अल्पकाळात ती मोडून का पडेनात. देशी ओबडधोबड खेळण्यांपेक्षा दिसायला मस्त आणि खिशाला स्वस्त! त्यांचे आयुर्मान किती? हा पालकांच्यासाठीही महत्त्वाचा विषय नसतो. बाहुला बदलला की मुलाचे रडणे बंद. पालकांचा प्रश्न संपला. अशीच राजकारणात श्रे÷ नेत्यांची भूमिका! अशा काळात गडकरी दर्जाला महत्त्व द्या, शॉर्टकटच्या नादाला लागू नका असे नागपुरातून सांगत होते. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने रोग रहित लिंबूवर्गीय रोपटे तयार करण्याच्या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत नर्सरीच्या लोकांना गडकरिंनी सांगितले की, आताचा जमाना हा क्वालिटीचा आहे. शॉर्टकट मारून लोकांना गंडवणे फारकाळ चालत नाही. राजकारण असो किंवा उद्योग व्यवसाय, त्यामध्ये कष्ट करूनच पुढे जावे लागते. लोकांना जास्त दिवस मुर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोक नंतर अशांना दारात उभे देखील करत नाहीत. राजकारणाचा विषय गडकरिंनी काढलेला असल्यामुळे शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि राज्यात होऊ घातलेले सत्तांतर याचा संबंध जोडणे माध्यमांना सोयीचे झाले. गडकरी यांचे विचार स्पष्ट आणि बेधडक असतात. तरीही त्यांचा रोख केवळ आजची भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का मानावा? शिवसेनेला आपल्या रोपावर प्रत्येक काळात बंडखोरीचा रोग का उद्भवतो? याचा शोध घ्यावा लागेल. प्रत्येक वेळी संघटनेच्या ताकदीवर बंडखोरी संपवली आणि पुन्हा त्याच चुका करून कार्पोरेट कल्चरच्या नादी लागून शिवसेनेतही चमचेगिरी करणाऱया, नेत्यांची लॉज, हॉटेलवर सोय करणारे भाव खाऊ लागले. एका हातात झेंडा आणि दुसऱया हातात धोंडा घेऊन उभे राहणारे होते तिथेच राहिले. नव्या व्यवस्थेत पिचत किंवा संपत गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावरच्या माणसाला नेता बनवले पण पुढे रस्त्यावरची माणसे रस्त्यावर आणि चकचकीत गाडय़ातून आलेली माणसे सत्तेवर अशी स्थिती झाली. बिल्डर, कारखानदार, कंत्राटदार घुसले. त्यांना सीबीआय, ईडी वगैरेंच्या कचाटय़ातून वाचवण्यासाठी केंद्रीय सत्तेला उद्धव ठाकरे यांनी शरण जावे असे पत्र हीच मंडळी लिहून ती माध्यमातून जाहीर करु लागली. छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते तळातून वर येत नेते झाले. पण ते नेते कमी, मुकादम जास्त झाले. दुसऱया कुणाला अधिकार मिळणे सहन करेनासे झाले. त्यांचे सर्व गुणदोष पक्षाला चिकटले. सत्य बोलणारे शिस्तभंगाचे धनी झाले. कोपऱयात ढकलले गेले. आता उद्धव ठाकरेंच्या साथीला ती रस्त्यावरचीच माणसे आहेत. त्यांनीही आता शॉर्टकट टाळला पाहिजे. पक्षात काय चालले होते? ती माणसे उमेदवार म्हणून कशी आणली? हे सगळे आता मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे, असे संजय राऊत यांनी काल शिवसैनिकांसमोर जाहीर केले. आतापर्यंत पक्षाचे संपर्क नेते, संपर्कप्रमुख जो राज्यभर धांगडधिंगा घालत होते ते सत्य ‘तेरी भी चूप, मेरी भी चुप’ न्यायाने लपवले गेले. आता त्यात सुधारणा व्हावी. भाजपमध्ये सध्या जी काही कृती सुरू आहे, त्याला शॉर्टकट मानलेच जात नाही. त्यांच्या दृष्टीने ती टी-ट्वेंटीची मॅच आहे. परपक्षातून येतानाच प्राइस टॅग लागून आलेले खेळाडू त्यांचा पक्ष सातत्याने खेळवत आहे. पक्षाचे मूळचे समर्थक या सगळय़ा गर्दीत कुठेतरी बाजूला फेकले गेले आहेत. त्यातील बहुतेकांच्या माथ्यावर अपयशाचे शिक्के मारलेले आहेत. त्या लोकांनी आपल्या काळात संघटना जिवंत ठेवली पण पक्ष यशाच्या दिशेने नेला नाही असे सांगत आता त्यांना बाजूला केले जात आहे. विशेष म्हणजे पक्ष मोठा करण्यासाठी जेव्हा परपक्षातील लोकांना भाजपने स्थान देण्यास सुरू केली, तेव्हापासून ही मंडळी पक्षहितासाठी बाजूला राहिले पाहिजे म्हणून निमुटपणे मिळेल ती जबाबदारी पार पाडत, पक्षाचे चिन्ह पोहोचवण्याचे काम करत होती. आता त्यांना कोपऱयात पोचवण्याचे काम परपक्षातील नेत्यांच्या भाऊगर्दीने केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असताना हीच मंडळी यश खेचून आणायची म्हणून त्यांना त्यांच्या पक्षात स्थान होते. त्यांच्या संस्थांचा डोलारा वाढत गेला आणि राजकारणात पैशाचा खेळ करण्याच्या नादात संस्था कर्जबाजारी झाल्या. त्या वाचवण्यासाठी हे लोक भाजपमध्ये आले. इथे येऊनही त्यांनी तोच खेळ मांडला. आज केंद्रीय सत्तेच्या आश्रयाला असलेली ही मंडळी शॉर्टकटने यशाचे स्वप्न दाखवत आहेत. हे गडकरी यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाला खटकणारे आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी विचारात घेतले पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या मंडळींची शिक्षा भोगली ती यापैकीच बहुतांश आहेत. आता ती मंडळी इतर पक्षांच्या वाटय़ाला आली आहेत! त्यांची नक्कल करता करता दोन पर्यायी पक्ष आपले अस्सल अस्तित्व हरवू लागले आहेत. शॉर्टकटने आज फायदा वाटत असला तरी गडकरी यांनी मांडलेले मत ही भविष्याची भीती नव्हे तर वास्तव समजले पाहिजे!
Previous Articleब्रह्म हेच सत्य असून, जग खरोखरच मिथ्या आहे
Next Article स्मार्टफोन्स उत्सवी काळात मिळणार सवलतीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.