डॉ.केतन भाटीकर यांचा सवाल
प्रतिनिधी/ फोंडा
आरोग्य सुविधांसाठी फोंडय़ातील जनतेची परवड चाललेली असतानाच, आता मृत व्यक्तींचा ‘मृत्यू दाखला’ मिळविताना त्याच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. सरकारच्या नवीन नियमानुसार मृत्यू दाखला देण्याचा अधिकार केवळ फिजिशियन डॉक्टरला दिल्याने जनतेची मोठी गैरसोय झाली आहे. आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीचा घरीच मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांवर शोक करण्यापेक्षा डॉक्टरांचे दरवाजे ठोठावत फिरण्याची वेळ आल्याची माहिती मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर दिली. यावेळी कुर्टीचे पंचसदस्य भिका केरकर हे उपस्थित होते.
फोंडा परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये अशा दोन ते तीन घटना घडल्या. त्यामुळे मृत व्यक्तांवर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करताना याठिकाणी मिळणाऱया सर्व सुविधा, पर्यायी सोय केलेल्या दिलासा इस्पितळात मिळतील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात रुग्णांचे प्रचंड हाल सुरु असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना आपत्कालीनवेळी साधी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ नये, हे सरकारचे मोठे अपयश असल्याची टिका त्यांनी केली. सध्या फोंडा तालुक्यासाठी सहा ते सात रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली. फोंडय़ातील कोविड इस्पितळाच्या आवारात वैद्यकीय कचऱयाचे ढिग साचले असून त्यातून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. कोरोना चाचणीसाठी नागरिकांकडून दोन हजार रुपये कोणत्या कारणासाठी आकारले जातात याचे स्पष्टीकरणही डॉ. भाटीकर यांनी मागितले आहे.
फोंडा भागातील जनता आरोग्य सुविधांबरोबरच वीज, पाणी या प्राथमिक गरजांसाठी हाल सहन करीत असल्याचे सांगून, पावसाळा संपण्यापूर्वीच येथील काही भागात पाणी टंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे. काही भागांमध्ये वीज पुरवठय़ाची समस्या आहे. फोंडय़ातील एकही रस्ता सध्या वाहने चालविण्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही. खड्डे बुजवून रस्ते हॉटमिक्स करण्याची सरकारकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या जानेवारी महिन्यात पाच हजार नोकर भरतीची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा जिल्हा पंचायत निवडणुकीवर डोळा ठेऊन केलेली आहे. जनतेच्या डोळय़ात धुळफेक करण्याचा हा प्रकार असल्याची टिकाही त्यांनी केली.