डॉ. विवेकानंद रेगे यांची माहिती : दै. तरुण भारतला दिली विशेष मुलाखत : कसाबला फाशी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान
महेश शिंपुकडे /निपाणी
दिल्ली येथे घडलेल्या आणि देशभरात हळहळ व्यक्त होत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा दिल्ली पोलीस गतीने तपास करत आहेत. श्रद्धाची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत जबडय़ाचा भाग तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. श्रद्धाच्या दातांची नस घेऊन ओळख पटविण्यासाठी पूरक स्थिती निर्माण होणार आहे. कसाबला 18 वर्षांवरील असल्याचे सिद्ध करून फासावर पोहचविण्याच्या प्रक्रियेत असाच धागा महत्त्वपूर्ण ठरला होता, अशी माहिती मुंबईचे प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. विवेकानंद रेगे यांनी दिली. निपाणी येथे डॉ. सुहास शाह यांच्याकडे आल्यानंतर बुधवारी तरुण भारतला त्यांनी विशेष मुलाखत दिली.
कसाबला फाशी झाली ती कोणत्या प्रक्रियेतून?
सन 2008 मध्ये 26/11 रोजी साथीदारांसह कसाबने हल्ला केला. यामध्ये तो दोषी स्पष्ट झाला असताना त्याचा ऍड. खान याने कसाब हा 18 वर्षांखालील असून अल्पवयीन असल्याने फाशी देता येणार नाही, असा न्यायालयात युक्तिवाद केला. हे समजताच देशप्रेमातून आपण डॉ. उज्ज्वल निकम यांना कसाबच्या अक्कलदाढेच्या आधारावर त्याचे वय स्पष्ट करू शकतो, असे सांगितल्यानंतर फॉरेन्सिक लॅबमध्ये जबडय़ाचे एक्सरे काढून अक्कलदाढेची झालेली वाढ निश्चित केली. तो 18 वर्षांवरील असल्याचे स्पष्ट झाले. अक्कलदाढेवरून फाशी देत कसाबला अद्दल घडविली.
श्रद्धाची ओळख कशी पटविली जाऊ शकते?
दिल्ली येथे हत्या झालेली श्रद्धा मुंबईची आहे. तिची ओळख पटविण्यासाठी तिने दातासंबंधी तक्रार केलेल्या डॉक्टरांकडून माहिती घ्यावी लागणार आहे. बोटाचे ठसे बदलले जाऊ शकतात. पण दाताची नस कधीच बदलता येत नाही. यामुळे नस समजताच सापडलेल्या जबडय़ाची नस घेऊन श्रद्धाची ओळख पटविता येते. त्याचप्रमाणे श्रद्धाची आई नाही त्यामुळे वडिलांच्या थुंकीचे सॅम्पल घेऊनही श्रद्धाची ओळख निश्चित करता येते. श्रद्धाला रागाच्या भरात नव्हे तर थंड डोक्याने नियोजन करून मारले आहे. यामुळे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होऊ शकते.
मूळ गाव, शिक्षण, ध्येय याविषयी काय सांगाल?
माझे वडील मूळचे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आरोंदा गावचे. ते कामाच्या निमित्ताने मुंबईत गेले. माझा जन्म व शिक्षणही मुंबईतच झाले. मला सैन्यदलात डॉक्टर म्हणून सेवा बजावायची होती, पण ते शक्य झाले नाही. दंतचिकित्सक म्हणून सेवा देताना पोलिसांचा डॉक्टर म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली. 20 वर्षे मुंबई पोलिसात विनामूल्य सेवा दिली. या सेवेबद्दल सन 2016 मध्ये मला सन्मानित करण्यात आले. येत्या दिवसात शासनाच्या ओरल कॅन्सर अवेअरनेस प्रिव्हेंशन स्क्रिनिंग (ओसीएपीएस) अंतर्गत सेवा देणार आहे. त्याचप्रमाणे तंबाखू व कॅन्सरमुक्त अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तपासणी यंत्रणेतही विनामूल्य सेवा देण्यासाठीही आपण कटिबद्ध आहे.
निपाणीशी नाते व डॉ. सुहास शाह यांच्याविषयी काय सांगाल?
निपाणी शहराशी तसे माझे नाते नव्हते. पण ज्यावेळी डॉ. सुहास शाह मुंबईत शिक्षणाच्या निमित्ताने आले आणि ते आमच्या कुटुंबातील सदस्य बनले. चांगला मित्र व योग्य मार्गदर्शक डॉ. सुहास शाह यांच्या माध्यमातून लाभला. कधीही मनमोकळय़ा गप्पा माराव्या वाटतात आणि विश्रांती हवी असे वाटते, त्यावेळी मी निपाणीला येतो. निपाणीत असणारी आपुलकी, कौटुंबिक जिव्हाळा हवाहवासा वाटतो. शांत, निसर्गरम्य, शांत शहर म्हणून आपण निपाणीला येत असतो.
वाढत्या दातांच्या तक्रारींचे कारण काय?
सध्या भारतीय संस्कृतीची आहार पद्धती मागे टाकून पाश्चात्य संस्कृतीच्या आहारावर अधिकतर ताव मारला जात आहे. भाकरी, चपाती, लाडूची जागा पिझ्झा, बर्गर, पावाने घेतली आहे. यातून चावण्याचा आहार मागे पडताना फक्त गिळण्याची संस्कृती वाढत आहे. यामुळे दात, जबडय़ांचा होणारा व्यायाम बंद झाला असून दातांचे विकार वाढत आहेत. त्याचबरोबर पोटाचे विकारही वाढत आहेत. पारंपरिक आहार स्वीकारण्यासाठी जागृती आवश्यक असून पारंपरिक आहार सेवनातून दातांच्या विकाराबरोबरच इतर विकारही दूर होऊन निरोगी, आरोग्य संपन्न, सदृढ भारत निर्माण होईल.
डॉक्टरांच्या सेवेविषयी काय सांगाल?
डॉक्टर म्हणजे देव असे संबोधले जाते. पण ते चुकीचे असून तो फक्त आरोग्य सेवक आहे. कोरोना संसर्ग काळात डॉक्टरांच्या सेवेला सर्व स्तरातून सलाम केला गेला, ही अभिमानाची बाब आहे. पण ही आत्मियता जनतेने कायम ठेवली पाहिजे. गैरसमजुतीतून कुठेही आरोप न करता सत्यता तपासली गेली पाहिजे. खरोखरच तपासातून सिद्ध झाल्यास डॉक्टरला जबाबदार धरले जावे. पण कोणतीही माहिती न घेता डॉक्टरांना आरोपी ठरवू नये. कारण डॉक्टर पेशा ही सेवा आहे.