या आठवडय़ात कोजागरी पौर्णिमेचा उत्सव आहे. यालाच श्रीमद भागवतमध्ये शरद पौर्णिमा उत्सव असे म्हटले आहे. वृन्दावनातील आपल्या प्रिय गोपीसमवेत पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णांनी रासलीला केली तो हा दिवस. श्रीकृष्ण हे आध्यात्मिक मार्गावरील लोकांना प्रेरित करणारे आणि स्वतःच्या लीलांनी मोहित करणारे असे व्यक्तिमत्त्व आहे तर अध्यात्माची जाण नसणाऱयांना अथवा कमी असलेल्याना भ्रमित करणारे, गोंधळून टाकणारे, चरित्रहीन, चोऱया करणारा, स्त्रियांचे कपडे चोरणारा आणि त्यांना नग्नावस्थेत पाहू इच्छिणारा, दुसऱयांच्या स्त्रियांबरोबर अनैतिक संबंध ठेवणारा आणि पौर्णिमेच्या रात्री त्यांना आपल्याबरोबर नृत्य करावयास लावणारा सर्वसाधारण लंपट पुरुष वाटतो. एकाच व्यक्तीबद्दल एवढा विरोधाभास का आहे?
सर्वसामान्य लोक मग ते कितीही शिकलेले, बुद्धिमान आणि प्रभावशाली असले तरी अध्यात्म सर्वसाधारणपणे ते समजू शकत नाहीत अथवा पूर्णपणे चुकीचा अर्थ ते स्वतःच्या बुद्धीने, मर्यादित आकलनाने काढतात आणि दुर्दैवाने अशा लोकांनी जे स्वतःला विचारवंत समजतात त्यांनी प्रामुख्याने ब्रिटिश विचारवंतांनी लिहिलेले वैदिक धर्मग्रंथ वाचलेले आहेत. बिटिशांचा हेतुपूर्वक उद्देशच होता की भारतातील धर्माबद्दल लोकांमध्ये गैरसमजूत पसरविणे, त्यांच्यामध्ये फूट पाडणे. म्हणून त्यांनी लिहिलेले असे वैदिक ग्रंथ वाचून लोकांच्या मनात संभ्रम, संशय आणि अनेक गैरसमजुती निर्माण झाल्या. त्याला दुर्दैवाने प्रति÷ित समाजसेवक, समाजधुरिण, राजकारणी इत्यादी समाजाला मार्गदर्शन करणारे थोर विचारवंतही अपवाद ठरले नाहीत. म्हणून श्रीराम, श्रीकृष्ण यांचे सविस्तर वर्णन असलेल्या रामायण, महाभारत, भागवत अशा पवित्र ग्रंथाबद्दल स्वतःच्या मनात गोंधळ निर्माण करून घेतला आणि त्याचबरोबर त्यांचे अंधानुकरण करत असलेल्या समाजालाही त्यांनी गोंधळून टाकले. परिणामी लोक नास्तिक, अधर्मी, चरित्रहीन आणि स्वैराचारी बनले. पण त्याचवेळी वेदिक धर्माचे तंतोतंत पालन करणारे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, विष्णुस्वामी, संत तुकाराम, पुरंदरदास, तुलसीदास, मीराबाई, नरसी मेहता, अलवार इत्यादी आचार्यांनी हा अध्यात्मिक ठेवा अर्थात श्रीराम आणि श्रीकृष्णभक्तीचा प्रवाह निरंतर सुरू ठेवला.
अध्यात्मिक ग्रंथ समजून घ्यावयाचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला भगवतगीता समजून घेतली पाहिजे. अध्यात्मातील पहिला धडा हा आहे की आपण शरीर नसून सत्चितानंद आत्मा आहोत. जेव्हा आपण शरीर स्तरावर कोणतेही धार्मिक ग्रंथ वाचतो तेव्हा त्याचा नेमका उलट अर्थ होतो आणि आपला गोंधळ होतो. श्रीकृष्णाची रासलीला हाही त्यातलाच एक प्रसंग आहे. धार्मिक साधुसंत जे स्वतः संन्यासी आहेत अथवा वैरागी जीवन जगतात ते श्रीकृष्णाची भगवान म्हणून प्रेमभावनेने भक्ती करतात, त्यांच्यासाठी श्रीकृष्णाची रासलीला ही अध्यात्मातील सर्वोच्च आणि पवित्र लीला आहे तर तथाकथित विचारवंतांना भ्रमित करणारा आणि पर्यायाने निंदा करून श्रीकृष्णावर लंपट, अनैतिक म्हणून दोषारोप करणारा प्रसंग आहे.
हा रासलीलेचा प्रसंग जिथे वर्णन केला आहे तिथे राजा परीक्षित महाराजसुद्धा शंकारूपाने हा प्रश्न वैरागी शिरोमणी शुकदेव गोस्वामींना विचारतात (भा 10.33/ 26.27) संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च । अवतीर्णो हि भगवानंशेन जगदीश्वरः स कथं धर्मसेतूनां वक्ता कर्ताभिरक्षिता । प्रतीपमाचरद् ब्रह्मन् परदाराभिमर्शनम् ।अर्थात अधर्माचा विनाश आणि धर्माची स्थापना करण्याकरिताच जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आपल्या अंशावतारासह या अवनीतलावर अवतरित झालेले आहेत. तेच धर्ममर्यादांचे मूळ वक्ता, कर्ता व उपदेशक आणि संरक्षकही आहेत. असे असताना परस्त्रियांचा स्पर्श करून त्यांनी स्वतःच धर्ममर्यादांचे उल्लंघन कसे काय केले? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना वैराग्यमूर्ती शुकदेव गोस्वामी म्हणाले, ‘अतिसामर्थ्यशील नियंत्रकांनी जरी धर्ममर्यादांचे उल्लंघन केल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यामुळे त्यांच्या पदास मुळीच दोष लागत नाही, कारण अग्नी आपल्या कक्षेत येणारी प्रत्येक वस्तू भक्षूनही अप्रदूषितच राहतो, त्याचप्रमाणे असे नियंत्रक दोषातीतच राहतात.’ सर्वप्रथम हे ध्यानात घेतले पाहिजे की भौतिकदृष्टय़ा रासलीला करतानाचे वेळी श्रीकृष्णाचे वय केवळ आठ वर्षाचे होते. या वयात सामान्य मूल कामुक असणे शक्मय नाही. आध्यात्मिकदृष्टय़ा आत्मा हा वासनारहित, कामरहित आहे तर परमात्मा श्रीकृष्ण कसे कामुक कृत्य करतील? तसेच भगवंत हे आत्माराम आहेत, आत्मतृप्त आहेत आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना दुसऱयाची आवश्यकता लागत नाही. श्रीकृष्ण परमेश्वर आहेत म्हणजे परम नियंता आहेत म्हणून ते कधी कधी स्वतः घालून दिलेल्या तत्त्वांचे उल्लंघन करूही शकतात. म्हणून शेवटी इशारा दिला आहे की कोणी श्रीकृष्णाच्या रासनृत्याचे अनुकरण करण्याचे मनातही आणू नये. जर कोणी तसा प्रयत्न करील तर तो भगवान शंकराच्या हलाहलाचे अनुकरण करणाऱया मनुष्याप्रमाणे ठार होईल. शेवटी शुकदेव गोस्वामी म्हणतात जे या रासलीलांचे वर्णन कामनारहित शुद्ध श्रीकृष्णभक्तांकडून ऐकतील त्यांच्या हृदयातील कामवासना पूर्णपणे नष्ट होतील.
विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णोः श्रद्धान्वितो।़नुश? ।णुयादथ वर्णयेद् यः । भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीरः अर्थात जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांनी व्रजगोपींसमवेत केलेल्या या रासक्रीडेचे श्रद्धेने श्रवण तथा कीर्तन करील, त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल, त्याचवेळी तो धीर होऊन हृदयातील कामवासनेच्या रोगावर मात करू शकेल. या सर्व कारणापेक्षाही सर्वात महत्त्वाचे आहे, जर श्रीकृष्णाची रासलीला हे जर अनैतिक कृत्य असते तर अध्यात्मातील अधिकारी असे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णुस्वामी, निंबार्काचार्य, चैतन्य महाप्रभु अशा संन्याशी वृत्तीच्या त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांसारख्या वैरागीवृत्तीच्या थोर आचार्यांनी श्रीकृष्णांची भक्ती केली नसती व श्रीकृष्णभक्तीचा प्रचार आणि प्रसारही केला नसता. तुकाराम महाराज तर रासलीलांचा गौरव करताना म्हणतात, न कळे ब्रह्मादिक माव । भक्तिभावे देव केला तैसा ।। तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ।। अर्थात श्रीकृष्णाची लीला ब्रह्मादिकांनाही उमजत नाही! त्याला गोपींनी भक्तिभावाने आपलासा केला. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे श्रीहरीचे सुख गोपीना प्राप्त झाले. त्यांचे कृष्णप्रेम म्हणजे सांसारिक कामना भगवंतालाच अर्पण करणे होय. आणखी एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे नटधारी । भोग भोगूनि ब्रह्मचारी अर्थात श्रीकृष्ण कौतुकाने नाना वेष धारण करून अनेक प्रकारचे भोग भोगूनही स्वतः ब्रह्मचारी आहे.
या कलियुगामध्ये काही आपमतलबी स्वार्थी भोंदू गुरु स्वतःला कृष्ण म्हणून घोषित करतात आणि गोपी म्हणून स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवतात, श्रीकृष्ण आणि गोपीसारखे वेष घालून कामुक नृत्य करतात त्यांची निंदा करताना तुकाराम महाराज म्हणतात, मोल देऊनिया साठवावे दोष । नटांचे ते वेष पाहोनिया ।।1।। हरिदास मुखे हरीकथाकीर्तन । तेथे पुण्यापुण्य विशेषता ।।2।। हरितील वस्त्रे गोपिकांच्या वेषे । पाप त्या सरिसें मात्रागमन ।।3।। तुका म्हणे पहा ऐसे झाले जन । सेवाभक्तीहीन रासी गोडी ।।4।। अर्थात जे रसिक पैसे देऊन नाटक तमाशात काम करणाऱया वेषधारी नटनटय़ांना पाहतात ते पैसे देऊन पापच विकत घेतात. श्रीकृष्णाचे चरित्र चारित्रसंपन्न हरिदासाच्या मुखाने श्रवण करणे हे पुण्यकर्मातील विशेष पुण्यकर्म आहे. हे नाटकी कलाकार कृष्णगोपीचे वेष परिधान करून वस्रहरणाचे खेळ करतात, त्यांना मातृगमनाचे पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात, पहा कसे हे लोक कृष्णभक्तीहीन असून विषयरसाचे ठिकाणी चाटले आहेत. आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिका देव ऐसा अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ।। जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे व्हावे संचित हे ।। अर्थात ब्रह्मादिकांनाही श्रीकृष्ण समजू शकत नाही तर सर्वसामान्य माणसांना तो काय समजणार. तुकाराम महाराज म्हणतात गोकुळातील गोप गौळणींसारखे भाग्य असावे लागते तरच श्रीकृष्ण समजू शकतो.
-वृंदावनदास