सौ. विजयावहिनी म्हणजे सर्वांची माउली होती, या एका वाक्यातच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सार सामावले आहे. सर्वांचे आदरणीय श्रीपादभाऊ आज जीवन-मरणाशी संघर्ष करत आहेत. श्रीपादभाऊंचा अपघात होणे आणि विजयाताईंचे जाणे गोव्याला धक्कादायक असून या धक्यातून बाहेर पडायला किती काळ लागेल, कोण सांगू शकतो?
सोमवार 11 जानेवारीची संध्याकाळ गोव्यासह देशालाच हादरवून सोडणारी ठरली. घटनाच अत्यंत दुःखदायक होती. वार्ता देणारा आणि ऐकणाराही थरथर कापत होता. तरीही मन घट्ट करून प्रत्येकाला बातमी ऐकावीच लागली. केंद्रीय आयुषमंत्री गोव्याचे लाडके आणि देशाचे आदरणीय नेते श्रीपादभाऊ यसो नाईक यांच्या कारला कर्नाटकातील होसकुंबी येथे भीषण अपघात झाला होता. श्रीपादभाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या श्रीपादभाऊप्रमाणेच सर्वांवर मायेची पाखर घालणाऱया विजयाताईंचा जागीच मृत्यू झाला होता. निजी सचिव आणि संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. दीपक घुमे यांचाही जागीच मृत्यू झाला होता. वार्ता ऐकणाऱयांचे सारे अवसानच गळून पडत होते. संपूर्ण गोवा हादरला. देशालाही धक्का बसला. श्रीपादभाऊंची प्रकृती स्थिर किंवा धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाबाजूने समस्त गोमंतकीय त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत तर दुसऱया बाजूने विजयाताईंच्या जाण्याने झालेल्या दुःखातून सावरणे कठीण बनले आहे. ही परिस्थिती गोमंतकीयांची आहे, तर खुद्द त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच करवत नाही. त्यांचे कितीही सांत्वन केले तरी त्यांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून निघू शकणार काय?
श्रीपादभाऊ गोव्यातील केवळ संघ परिवाराचेच नव्हे तर गोव्याच्या एकूण सामाजिक, राजकीय क्षेत्राचे उर्जस्वल, आदर्शवादी, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. गोव्याचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतरचे खऱया अर्थाने सच्चे लोकनेते! त्यांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे ते देशभरातही सर्वांसाठी आदरणीय श्रीपादजी ठरले आहेत. अगदी अटलबिहारी वाजपेयीजींपासून सर्वच लहानथोरांचे ते लाडके आहेत. अशा या महान श्रीपादभाऊंना झालेल्या अपघातामुळे गोव्याला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. वैचारिक, पक्षीय मतभेद विसरून श्रीपादभाऊंशी जोडले गेलेल्या समस्त गोमंतकियांना अजूनही या धक्क्यातून सावरणे कठीण होऊन बसले आहे. त्यांच्या या अपघातामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अन्य नेतेमंडळींना अतिव दुःख झाले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह गोव्यात दाखल होऊन गोमेकॉत त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजप नेते शहानवाझ हुसेन यांनी गोमेकॉत जाऊन विचारपूस केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून श्रीपादभाऊंच्या उपचारांकडेच लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनीही विजयाताई तसेच डॉ. दीपक घुमे यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट करून श्रीपादभाऊंची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. श्रीपादभाऊ हे माणसांमधले देव. देवमाणूस! हे देवत्व प्राप्त होण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी जीवनात सतत स्वतःशीच संघर्ष करत रहावे लागते. तोच संघर्ष करत आलेले श्रीपादभाऊ आज जीवन-मरणाशी संघर्ष करत आहेत. असे म्हणतात माणसाचा चेहरा खोटा असू शकतो, मात्र सावली नव्हे. ही सावली कधीच साथ सोडत नाही, मात्र श्रीपादभाऊंची सावली म्हणजे विजयावहिनी त्यांना सोडून गेल्या आहेत. पद्यनाभ शिष्य संप्रदायाचे तत्कालीन मठाधीश प. पू. ब्रम्हानंद स्वामींजीचे परम शिष्य असलेल्या स्व. महानंदू गणसू नाईक यांच्या त्या कन्या होत. अशा सुसंस्कृत, भारतीयत्व, हिंदुत्व सांभाळणाऱया, धार्मिक घराण्यातून आलेल्या विजयावहिनींनी श्रीपादभाऊंना स्वतःच्या अंतापर्यंत साथ दिली. त्यांनी भाऊंप्रमाणेच सर्वांवर मायेची पाखर घातली. त्या कुणासाठी बहीण, आई, पत्नी होत्या तर कुणासाठी विजयावहिनी होत्या. कुणासाठी विजयाताई तर कुणासाठी विजयाकाकी. यापैकी सर्व नात्यांमधून सर्वांना मिळाले ते मातेचे ममत्वच! कौटुंबिक जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी भाऊंना संघ, भाजपाच्या कार्यातही साथ दिली. संघ परिवारालाही साथ दिली, प्रेम दिले. ती सर्वांची माउली होती, या एका वाक्यातच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सार सामावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्राचीन औषधीचे संवर्धन करण्यासाठी आयुष मंत्रालय स्थापन केले आणि त्याची जबाबदारी श्रीपादभाऊंकडे दिली. गेली सहा वर्षे सतत कार्यरत राहून भाऊंनी या मंत्रालयाचे कार्य देशातच नव्हे तर जगभरात प्रभावीपणे केले. त्यांच्या या कार्यात त्यांना साथ देणारे, आयुषच्या केंद्रीय मंडळावर कार्य करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, श्रीपादभाऊंचे निजी सचिव, निस्वार्थी डॉ. दीपक घुमे यांचाही या अपघातात अंत झाला. डॉक्टर म्हणून कोणतेही शुल्क न घेता ते रुग्णांची सेवा करत होते. संघाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी समुदायाची सेवा केली होती. गोव्यात ते सर्वांच्याच परिचयाचे होते असे नाही. मात्र जे कोणी त्यांच्या संपर्कात आले होते त्यांना त्यांच्या बोलण्या-वागण्यातही प्रत्यक्ष श्रीपादभाऊच दिसत होते.
अत्यंत महत्त्वाची दोन माणसे गेली, एक जीवन-मरणाशी संघर्ष करत आहे. अशा या अपघाताची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. श्रीपादभाऊ हे या राष्ट्राचे मंत्री आहेत, संरक्षण राज्यमंत्री आहेत. असे असतानाही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत या अपघाताने प्रश्न निर्माण केले आहेत. श्रीपादभाऊना स्वतःला तशी आवश्यकता भासणारच नाही, पण प्रशासनावर सुरक्षेची जबाबदारी असतेच ना. चांगला महामार्ग असताना कारचालक खराब रस्त्याने का गेला? या कारसोबत पुढे व मागे एस्कॉर्ट कार होत्या की नाही? घायाळ झालेल्या श्रीपादभाऊंना साध्या ऍम्ब्युलन्सपेक्षा एअर ऍम्ब्युलन्समधून का आणले नाही? खुद्द कारवारला आशिया खंडातील सर्वात मोठा संरक्षण तळ असून तेथे सर्व सुसज्जता असताना तेथे न नेता एवढय़ा लांबून गोव्यात का आणले असे प्रश्न उपस्थित होतात. श्रीपादभाऊंचा अपघात होणे आणि विजयाताईंचे जाणे गोव्याला धक्कादायक असून या धक्यातून बाहेर पडायला किती काळ लागेल, कोण सांगू शकतो?
राजू भि. नाईक