पंतप्रधान, राज्यपालांकडून दुःख व्यक्त : पर्तगाळी मठ परंपरेतील 23 वे स्वामी मठ अनुयायांची दर्शनासाठी गर्दी
प्रतिनिधी /काणकोण, पणजी
श्री गोकर्ण पर्तगाळी मठ संप्रदायातील 23 वे मठाधीश प. पू. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांचे काल सोमवार 19 रोजी सकाळी 11.45 वा. महानिर्वाण झाले. त्याचदिवशी रात्री पर्तगाळी मठातील पवित्र समाधीस्थळी त्यांच्यावर विधिवत समाधीचे सोपस्कार करण्यात आले.
मठ परंपरेतील 22 वे मठाधीश श्रीमद द्वारकानाथतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर चैत्र शुक्ल द्वितीयेला 1973 साली मठाच्या स्थापनादिनी विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांनी श्री जिवोत्तमतीर्थ गोकर्ण पर्तगाळी मठाची जबाबदारी स्वीकारली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुःख
पर्तगाळी मठाचे मठाचे स्वामीच्या निर्वाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटद्वारे संदेशात त्यांनी स्वामीना विनम्र आदरांजली वाहिली आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोकर्ण मठ संस्थान- काणकोणच्या श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे. त्यांच्या निधनाने गोवा राज्य खऱया संन्यासीला मुकला आहे. गोव्याची भरुन न येणारी हानी झाली आहे. ते बुद्धीमान, धार्मिक वृत्तीचे होते आणि संस्कृतीमधील खऱया मानवी मुल्यांची ओळख त्यांनी करुन दिली आहे, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही दुःख व्यक्त केले आहे. आमदार आर.व्ही. देशपांडें यांना दुःख
पर्तगाळी मठाधीशांचे जाणे सर्वांसाठी चटका लावणारे असून त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. देशभरातील जुने मठ, मंदिरे यांच्यासाठी ते नेहमीच कार्यरत राहीले. गौड सारस्वत ब्राह्मण समाजासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांनी तरुण पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले, अशा शब्दांत आमदार आर. व्ही देशपांडे यांनी दुःख प्रकट केले आहे.
अंतिम दर्शनाची अनुयायांची गर्दी
प. पू. स्वामी महाराजांचे महानिर्वाण झाल्याचे वृत्त समजताच काणकोण तालुक्यातील विविध अनुयायांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पर्तगाळी मठात एकच गर्दी केली. दुपारी 12 पासून सतत मठात मंत्रघोष चालू होता. सर्वत्र दुःखाची छाया पसरली होती. बेळगाव आणि उर्वरित कर्नाटकातून मोठय़ा संख्येने अनुयायी या ठिकाणी यायला निघाले असून माजाळी चेकनाक्यावर 150 पेक्षा अधिक वाहने खोळंबून पडली आहेत. मात्र कोरोनामुळे सावधगिरी बाळगून मोजक्याच लोकांना कोविड चाचणी करून प्रवेश दिला जाईल, असे यावेळी मामलेदार विमोद दलाल यांनी स्पष्ट केले. मोले आणि चोर्ला घाटमार्गेही येण्यासाठी बेळगाव येथून अनुयायी रवाना झालेले असून त्यांनाही चेकनाक्यांवर अडवून ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत स्वामी महाराजांचा समाधी सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत चालू होता.
स्वामींनी मठ परंपरेची पताका नेली देशभर
आपल्या या 48 वर्षांच्या कालावधीत स्वामी महाराजांनी सारस्वत समाजाची आणि मठ परंपरेची पताका संपूर्ण देशभर पोहोचविली. पर्तगाळी मठाचा जीर्णोद्धार करतानाच ही वास्तू सारस्वत समाजाचे प्रमुख केंद्र बनावे, यासाठी त्यांनी लक्ष दिले. कडक शिस्त, गुरूभक्तीच्या जोरावर देशाच्या विविध भागांत मठाच्या शाखा सुरू केल्या. कित्येक भागांतील मठांचा जीर्णोद्धार केला.
पूर्वाश्रमीचे राघवेंद्र आचार्य
या मठाची स्थापना 1475 साली श्रीमद् नारायणतीर्थ स्वामी महाराजांनी केली होती. 1945 साली श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांचा जन्म गंगोळी या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव राघवेंद्र आचार्य होते. 1967 साली वडाळा मठात त्यांचे गुरूवर्य श्रीमद् द्वारकानाथतीर्थ स्वामी महाराजांनी त्यांना शिष्यस्वामीची दीक्षा दिली आणि संन्याशाने ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्यांचे शिक्षण दिले, अशी माहिती अनिल पै यांनी दिली.
विद्याधिराज पुरस्काराची परंपरा
मठ स्थापनेच्या 1975 साली सुरू केलेल्या पंचशताब्दी महोत्सवातून स्वामी महाराजांनी देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या सारस्वत समाजातील लोकांना संघटित करण्याचे काम करतानाच समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करून नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींना गुरूपीठारोहणाच्या दिवशी विद्याधिराज पुरस्काराने सन्मानित करण्याची नवी प्रथा चालू केली. पर्तगाळी मठाची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि विविध भागांत विखुरलेल्या मठाच्या अनुयायांना संघटित करण्यासाठी स्वामी महाराजांनी चतुर्मास व्रताचरणाचा अवलंब केला. संपूर्ण देशभर मिळून 33 मठ आहेत. त्यातील 11 मठ विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांनी उभारले. गोव्यात मडगाव, पर्वरी, वास्को या ठिकाणी मठ उभारले आहेत. ज्या ज्या भागांत सारस्वत समाज विखुरला होता त्यांना एकत्रित करण्याचे काम करताना शैक्षणिक व सांस्कृतिक दर्जा वाढविण्याचे काम त्यांनी केले.
असे स्वामी मिळणे हे आमचे भाग्य : श्रीनिवास धेंपे
पर्तगाळी मठ आणि आपल्या घराण्याचा जवळजवळ 300 वर्षांपासूनचा संबंध आहे. आताच्यासारखे इंटरनेट, व्हॉट्सऍप, सोशल मीडिया किंवा अन्य सुविधा ज्या काळात नव्हत्या त्या काळात सर्व कामे पत्रव्यवहाराने केली जायची. सर्व गोष्टी शिस्तीने स्वामी महाराज करायचे, सर्व व्यवहार नीट नेटका ठेवायचे. अशा प्रकारचे स्वामी मिळणे हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया पर्तगाळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी व्यक्त केली. स्वामी महाराजांची स्मृती दांडगी, सर्व गोष्टींचा अभ्यास होता आणि प्रत्येकाला नावाने ओळखण्याची कला त्यांना अवगत होती. या ठिकाणी तांत्रिक शिक्षण देणारी संस्था असावी अशी त्यांची इच्छा होती. पण ती त्यांची इच्छा मात्र अधुरी राहिली. सर्वांशी अगदी प्रेमाने वागणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. या ठिकाणच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमची उपस्थिती राहायची. स्वामी महाराजांनी आमच्यावर तसेच सर्व समाजावर प्रेम केले. त्यांनी सर्व गोष्टी ज्या पद्धतीने या ठिकाणी उभारल्या आहेत त्यामुळे येणाऱया स्वामी महाराजांना विशेष असा त्रास पडणार नाही. ही मठ परंपरा येणारे स्वामी देखील तशीच पुढे चालू ठेवतील, असा विश्वास धेंपे यांनी व्यक्त केला.
मठाचा फार मोठा उद्दार घडविला : दिगंबर कामत
1973 साली विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांनी या मठाची धुरा स्वीकारल्यानंतर पर्तगाळी मठाचा फार मोठा उद्धार झाला आणि स्वामी महाराजांची कारकीर्द देशभरात गाजली, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. आरोग्य बरे नसताना त्यांनी गंडकी यात्रा केली. आपल्याच समाजापुरते न पाहता अन्य समाजांसाठी त्यांनी प्रकल्प उभारले. पनवेलसारख्या भागात ज्या ठिकाणी बहुसंख्य बहुजन समाजाचे लोक राहतात त्या ठिकाणी अनेक प्रकल्प त्यांनी राबविले. सर्वांना एकत्र करण्याचे काम त्यांनी केले आणि मठ अनुयायांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. दरवेळी आम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच जायचो. यावेळी मात्र पहिल्यांदाच रिकाम्या हाताने जावे लागत असल्याचे मत भावूक स्वरात कामत यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मठ समितीचे भाई नायक, माजी आमदार विजय पै खोत, डॉ. राजन कुंकळय़ेकर, पुतू पै, मठ समितीचे अन्य पदाधिकारी आणि गोवा, कर्नाटक तसेच अन्य प्रांतांतून आलेले मठाचे अनुयायी उपस्थित होते
सरकारचे प्रतिनिधी म्हणून इजिदोर फर्नांडिसांची उपस्थिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावतीने सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो असून आपले आणि स्वामी महाराजांचे अगदी जवळचे संबंध होते. बऱयाच वेळा स्वामी महाराज हक्काने आपल्याला बोलावणे पाठवत असत. आपला त्यांनी यापूर्वी चांगल्या कार्याबद्दल सत्कारही केला होता असे सांगून उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी स्वामी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मठाच्या अनुयायांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगितले.
चतुर्मास व्रताचरण प्रारंभ लांबणीवर
कोरोना महामारीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून यंदाचे चतुर्मास व्रताचरण 28 जुलैपासून पर्तगाळी मठात सुरू होणार होते. मात्र चतुर्मासाचा प्रारंभ काही दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे चतुर्मास व्रताचरणाला अनुयायांनी उपस्थित राहू नये असे याआधीच स्वामी महाराजांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंतचे हे पर्तगाळी मठातील 7 वे चतुर्मास व्रताचरण राहणार आहे, तर एकूण 55 चतुर्मास या मठ परंपरेत आतापर्यंत साजरे केले गेले आहेत. स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मठ परंपरेनुसार त्यांना समाधी देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध धार्मिक विधी करावे लागतात आणि त्या धार्मिक विधींसाठी कर्नाटकातून पंडित येणार आहेत. या विधींसाठी चार ते पाच तासांचा अवधी लागणार आहे. मठाच्या अनुयायांनी या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन मठ समितीचे अध्यक्ष धेपे यांनी यावेळी केले.
2016 मध्ये शिष्य स्वामी स्वीकार
स्वतः उच्च पदवीधर असलेल्या श्री विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांनी मठ परंपरेचा वाढता व्याप लक्षात घेऊन 2016 साली बेळगाव येथील शिष्यस्वामी स्वीकारले आणि त्या शिष्याचे नामकरण श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज असे करण्यात आले. पर्तगाळी मठात सतत तीन दिवस हा शिष्य स्वीकार सोहळा चालू होता. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या निर्वाणानंतर संपूर्ण मठाची जबाबदारी आता शिष्यस्वामीवर येऊन पडलेली असून ते देखील उच्च शिक्षित आहेत. त्याचबरोबर लवकरच नव्या स्वामी महाराजांचा पीठारोहण सोहळा या ठिकाणी होणार असल्याचे धेंपे यांनी सांगितले.
महानिर्वाणाची दिली होती कल्पना
अनुयायांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्तगाळ मठाच्या जमिनींची जबाबदारी पाहणाऱया महेश नायक या अभियंत्यांना आठ दिवस अगोदर स्वामी महाराजांनी आपल्या महानिर्वाणाची कल्पना दिली होती. आपल्या महानिर्वाणानंतर कोणत्या जागी समाधी द्यावी ती जागा त्याचप्रमाणे त्यानंतर करायच्या सर्व सोपस्कारांची माहिती स्वामी महाराजांनी नायक यांना दिली होती.
इस्पितळात जायला नकार
19 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान ज्यावेळी स्वामी महाराजांच्या छातीत दुखायला लागले त्यावेळी त्वरित काणकोणचे शल्यचिकित्सक डॉ. अमन प्रभुगावकर यांना पाचारण करण्यात आले. डॉ. प्रभुगावकर यांनी त्यांना इस्पितळात हलविण्याची विनंती केली. परंतु स्वामी महाराजांनी त्या गोष्टीला नकार दिला. आपण स्वतः, आपला मुलगा दिव्यल पै त्यावेळी स्वामी महारांजाच्या जवळ होते, अशी माहिती दिनेश पै यांनी दिली.
जनार्दन भंडारी यांनी ऑक्सिजन पुरविला
स्वामी महाराजांना ऑक्सिजनची त्वरित आवश्यकता भासली त्यावेळी जनसेनेचे जनार्दन भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता भंडारी यांनी त्वरित ऑक्सिजनची सोय केली. परंतु त्याचा विशेष प्रभाव पडला नाही आणि आधीच स्वामी महाराजांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती दिनेश पै यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेलाही दुःख
पर्तगाळी मठाधीश श्री वडेर स्वामींच्या महानिर्वाणाने गोवा एका चांगल्या धर्मगुरुला मुकला आहे आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद हा नेहमीच जनतेच्या पाठीशी राहील असे निवेदन विश्व हिंदू परिषद गोवाचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक यांनी केले. स्वामींच्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून विविध कार्यामध्ये स्वामींचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा व त्यांच्या आशीर्वादानेच गोव्यात विश्व हिंदू परिषदेचा मातृछाया प्रकल्प पूर्ण झाला. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती असे ते म्हणाले.
पर्तगाळ जीवोत्तम मठाचे परम पूज्य विद्याधिराज तीर्थ वडेर स्वामीजी एक अभ्यासू आणि महान आध्यात्मिक गुरू आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या महानिर्वाणाला आपले प्रणाम व श्रद्धांजली अशी प्रतिक्रीया दक्षिण गोव्याचे माजी खा. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केली आहे. फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी देखील परमपूज्य श्रीमद् विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजीच्या महानिर्वाणावर श्रद्धांजली वाहिली आह