भीमराजाने आपली लाडकी कन्या दमयंतीच्या स्वयंवराची घोषणा केली आहे, देशोदेशीचे राजे, राजपुत्र त्यासाठी सिद्ध होऊन विदर्भदेशाकडे प्रस्थान करीत आहेत, ही वार्ता देवलोकापर्यंतही पोचली! नारदही वार्ता ऐकून अमरावती नगरीकडे गेले. त्यांच्याबरोबर पर्वत नावाचे एक ऋषीही होते. ते दोघेही इंद्रसभेत गेले. तेथील उपस्थित सभाजनांनी आदरपूर्वक उभे राहून त्यांचा सन्मान केला. कुशलवर्तमानाचे आदानप्रदान झाले. इंद्राने विचारले, ‘नारदमुनी, आत्मीय जनांच्या सहवासामुळे खूप आनंद झाला. पुण्यवंत राजे पूर्वी स्वर्गात येत असत, जात असत. परंतु अलीकडे कोणीही राजा इकडे येत जात नाही. आता तर नलराजाचे राज्य आहे, मग राजांचे येणेजाणे का बरे नाही?’
नारदांनी उत्तर दिले, ‘हे महेंद्रा, शंभर याग केल्याने इंद्रपद मिळते हे खरंय ना! पूर्वी राजे शतयज्ञ करून पुण्यवान होत असत, त्यामुळे ते इकडे येत असत. आता पृथ्वीवर भीमराजाची कन्या दमयंती ही अनुपम अशी लावण्यवती आहे. त्यामुळे सारे राजे तिची अभिलाषा करतात, स्वर्गात येण्याची नाही!’ नारदांचे हे बोलणे ऐकून इंद्रादी देव अतिशय संतुष्ट झाले. ते देखील दमयंतीच्या अभिलाषेपोटी पृथ्वीवर येण्यास उत्सुक होते. दमयंतीच्या अजोड सौंदर्याची प्रशंसा ऐकून स्वर्गातील अप्सरांनाही लाज वाटू लागली. तेव्हा इंद्रासह अष्ट दिक्पाल दमयंतीला वश करण्यासाठी भूलोकी अवतरले. वाटेत निषधराज नलाचीही त्यांनी भेट घेतली. देवांनी त्याला पाहून स्वतःच्या सौंदर्याचीही निंदा केली. सर्व देवांनी आपापला परिचय नलाला करून दिला. इंद्राने नलाला विनंती केली की, ‘महाराज, तुम्ही आमचे दूत म्हणून काम करा. दमयंतीपर्यंत आमची इच्छा व्यक्त करा.’ नलाने ती विनंती मान्य केली आणि तो मायावी शरीर धारण करून दमयंतीकडे गेला. इंद्रादी देवांनी पाठवलेला दूतीरूपातील नलराजा दमयंतीच्या प्रासादात पोचला. त्याने दुरूनच दमयंतीला पाहिले. तिथे तिच्या शेकडो मैत्रिणी होत्या. म्हणून नलराजा तिच्या महालात गेला. तिच्याजवळ कोणी एक दूती उभी होती. तिला इंद्राने पाठवले होते. वरूण, अग्नी, यम इत्यादी दिक्पालांनीही दूती पाठवल्या होत्या. पण दमयंतीने त्या सर्वांना दूर केले. एक दूती दमयंतीजवळ येऊन इंद्राची प्रशंसा करू लागली, ‘तुम्ही इंद्रालाच वरणे सुयोग्य होईल!’ असे ती सांगत होती!
नल आणि दमयंती एकमेकांवर अनुरक्त होते. दूतीच्या रूपात का होईना, पण त्याला दमयंतीच्या दर्शनाची ओढ लागली होती, ती अशी पूर्ण झाली. व्यतिषजतिपदर्थानान्तरः कोएपि हेतुः। न खलु बहिरुपाधीन्प्रीतयः संश्रयन्ते।। पदार्थांना एकमेकांकडे ओढून घेणारा अवर्णनीय असा आंतरिक हेतू असतो. प्रेम हे बाह्यगोष्टींवर आधारलेले नसते!