ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देण्यासाठी 101 संरक्षण सामग्रींची आयात बंंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंंत्री राजनाथ सिंंह यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
संरक्षण मंंत्रालयानेे आयात बंद करण्यात येणाऱ्या 101 संरक्षण सामग्रींची यादी तयार केली आहे. या आयात बंदीचे निर्बंध 2020 ते 2024 दरम्यान हळूहळू लागू करण्यात येतील. संरक्षणासाठी लागणारी उत्पादने ही भारतातील असावीत, हा निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला त्यांच्या स्वत:च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून संरक्षण सामग्री तयार करण्याची संधी मिळेल.
संरक्षण मंत्रालयाने खासगी आणि पब्लिक सेक्टरशी चर्चा करुन 101 सामग्रीची यादी तयार केली आहे. आत्तापर्यंत 260 योजनांसाठी भारताच्या तिन्ही दलांनी एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2020 या कालवाधीत 3.5 लाख कोटींची कंत्राटे दिली होती. यापुढे भारतीय उत्पादकांना ही कंत्राटे देण्यात येतील.
आयात बंद केलेल्या संरक्षण सामग्रीमध्ये सैन्य आणि हवाई दलासाठी 1,30,000 आणि 1,40,000 कोटी रुपयांच्या सामुग्रीचा समावेश आहे. या सामग्रीमध्ये आर्टिलरी गन, रायफल्स, कॉर्व्हेट्स, सोनार सिस्टम, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स, एलसीएच, रडार अशा मोठ्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे.