मुख्यमंत्र्यांच्या अधिकारीवर्गाला सक्त सूचना : विश्रामधामात घेतली पूर आढावा बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळी जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्या तरी त्वरित संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना केली.
पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर सरकारी विश्रामधाम येथे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठवडाभरात मोठय़ा प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील अधिकारी सातत्याने महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत. पूर नियंत्रणात आणण्यासाठी धरणांच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या वषी पुरावेळी ज्या घरांची पडझड झाली, त्यांना त्वरित भरपाई द्यावी. जिल्हय़ातील 113 गावांना पुराची भीती आहे. तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी 89 निवारा केंदे उभारण्यात आली आहेत. अशा संकटाच्या काळी जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास वरिष्ठ अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, अशी सूचना केली.
यावेळी महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले, पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी व पूरग्रस्तांसाठी औषधे व इतर सामग्री खरेदी करण्यासाठी एनडीआरएफ अनुदानाचा वापर करावा. या व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदानाची गरज भासल्यास तसा प्रस्ताव पाठवावा. एनडीआरएफ अनुदान वाढविण्यासंबंधीही पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री व बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, पुरात जी जनावरे वाहून गेली आहेत, त्यासंबंधी स्थानिक पातळीवर माहिती जमवून भरपाई देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. आलमट्टी धरणात सध्या 72 टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविण्यासंबंधी निर्णय घेण्यात यावा. बेळगाव विभागात 1400 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले आहे. 305 पुलांची हानी झाली आहे. एकूण 1200 कोटींची हानी झाली असून दुरुस्तीसाठी त्वरित 170 कोटी रुपये मंजूर करावेत, अशी मागणी केली.
कृष्णा नदीत पाणी वाढते आहे. त्यामुळे आलमट्टी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यासंबंधी वेळेत कार्यवाही करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली.
याप्रसंगी गरज लक्षात घेऊन नदीकाठावरील गावांना बोटी पुरवाव्यात. पुरामुळे पडझड झालेल्या व पूर्णपणे कोसळलेल्या घरांचे सर्वेक्षण करावे व प्राधान्यक्रमाने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार महांतेश कौजलगी यांनी केली. यावेळी मंत्री श्रीमंत पाटील, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.