प्रतिनिधी/ संकेश्वर
येथील जुन्या पुणे-बेंगळूर मार्गावर वडापाव, चहा टपऱया, भजी आदी असणारी खोकी नगरपरिषदेने शनिवारी हटवली आहेत. यापुढे कोणताही खोका रस्त्याच्या दुतर्फा दिसणार नाही, असा इशाराही यावेळी खोकीधारकांना दिला. सदर खोक्यांमुळे अतिक्रमण होत असून आपले व्यवसाय आपल्या दुकान गाळय़ातच चालवावेत, अशी सूचनाही नगरपरिषदेकडून देण्यात आली. दरम्यान सदर कारवाईमुळे लहान व्यावसायिकांना मात्र मोठा फटका बसला असून सदर कारवाई पूर्वसूचना न देता अचानक करण्यात आल्याने खोकीधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गाच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात लहान व्यापाऱयांनी खोकी उभी करून वडापाव, भजी यासह अन्य दुकाने थाटली आहेत. या खोक्यांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र शनिवारी सकाळी अतिक्रमणाचे कारण पुढे करून नगरपरिषदेने सुमारे 20 खोकी हटवली असून उर्वरित खोकी हटवण्यास 1 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
हटवलेल्या खोकीधारकांना व्यवसाय थाटण्यासाठी कोणतेच अन्य ठिकाण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे खोकीधारकांनी आपली खोकी सरळ घरपोहोच केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सुमारे 30 कुटुंबे सदर खोकी उभारुन थाटलेल्या व्यवसायावर अवलंबून होती. पण नगरपषिदेने कोणतीच नोटीस अथवा सूचना न देता शनिवारी सकाळी टॅक्टर आणला व खोकी भरण्याचे काम चालू केले. अचानक अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर कसा आला. यामागे कोणते कारण आहे, असा संतप्त सवालही खोकीधारकांनी उपस्थित केला आहे.
भाजीपाला बाजारानंतर दुसरी कारवाई
गेल्या चार दिवसापूर्वी आमदार उमेश कत्ती यांनी मार्केटयार्डातील भाजी विक्रेत्यांची भेट देऊन यापुढे मार्केट यार्डातच भाजीपाला बाजार भरणार आहे. तेंव्हा आपण कोणीही सुभाष रोडवर भाजी, केळी, फळे व फुलांचे दुकान थाटू नये, असे सांगून राणी चन्नम्मा मार्केट यार्डात भाजीपाला बाजार कायम केला आहे. हा निर्णय चर्चेत असतानाच शनिवारी नगरपरिषदेने हटवलेली खोकी यामुळे शहरात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.