वार्ताहर / राजापूर, संगमेश्वर, ताम्हाणे
जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कावळे आढळून येत असताना राजापूर शहरातील कोंढेतड चिंचबांध पुलानजीक रविवारी सकाळी 1 मृत कावळा आढळून आला. तसेच संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यापाठोपाठ शास्त्रीपूल येथे 4 आणि साखरपा हायवेनजीक 1 मृत कावळा सापडल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या मृत कावळ्यांना उत्तरीय तपासणीसाठी तालुका पशुवैद्यकीय विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्लूचा फैलाव वाढत चालला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, रत्नागिरी, गुहागर आणि लांजात तालुक्यात काही मृत पक्षी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा भीतीच्या छायेखाली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राजापूर शहरात 1 मृत कबूतर आढळून आले होते. मात्र ते कोणत्यातरी प्राण्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना कोंढेतड-चिंचबांध पुलानजीक रस्त्यावर त्यांना 1 मृत कावळा आढळला. त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने मृत कावळ्याला उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागाकडे सुपूर्द केले.
साखरप्या पाठोपाठ शास्त्रीपूल येथे सापडले 4 कावळे
संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यापाठोपाठ शास्त्राrपूल येथे शनिवारी रात्री 4 कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. दापोली, लांजानंतर आता संगमेश्वर तालुक्यातही मृत कावळे सापडल्याने आरोग्य विभागाने सतर्कतकेचा इशारा दिला आहे.
संगमेश्वरजवळच्या शास्त्राrपूल येथे वहाब दळवी यांच्या घरासमोर असलेल्या पळसाच्या झाडावरुन 4 कावळे मृतावस्थेत जमिनीवर पडले. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर वहाब दळवी यांनी लगेच तहसीलदार सुहास थोरात यांना घटनेची माहिती दिली. तसेच रविवारी सकाळी 10 च्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी ढाकणे यांनी मृत कावळ्याचे अवशेष ताब्यात घेतले आणि अधिक तपासणीसाठी पुणे येथे पाठवले. त्याचा अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात प्राप्त होणार आहे. काही दिवसापूर्वी साखरपा येथे मृत कावळा सापडला होता. त्यानंतर संगमेश्वर परिसरात 4 मृत कावळे सापडल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
साखरप्यात आढळला मृत कावळा
कोरोनानंतर देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूचा आजार वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर साखरपा हायवेनजीक एक मृत कावळा दिसला. हा कावळा भररस्त्यात पडला होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु हा कावळा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानेही मृत झाल्याची शक्यता उपस्थितांमधून वर्तवली जात आहे.
दरम्यान, पशू अधिकाऱयांशी संपर्क केला असता काही वेळानंतर ते उपस्थित झाले व एका सहाय्यकाला तेथे पाठवून दिले. हा कावळा भररस्त्यात पडलेला असल्याने स्थानिकांनी तो बाजूला केला व त्यावर आडोसा देण्यात आला होता. जेणेकरून दुसरा कोणता प्राणी त्या मृत कावळÎाला ओढून नेऊ नये. कावळा मृत झालेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉ. कुणकवळेकर हे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी मृत कावळा ताब्यात घेऊन तपासणीसाठी तो पुणे येथे पाठवून देण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, परंतु अशाप्रकारे पक्षी मृत झाल्याचे समजताच ताबडतोब पशूवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, यावेळी पशूवैद्यकीय खात्यातील रिक्त असणाऱया पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. येथे कार्यरत असणाऱया डॉक्टरना तब्बल 28 गावांचा कारभार पहावा लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे शासनामार्फत या जागा तातडीने भरणे गरजेचे आहे.