सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
@ नागपूर / वृत्तसंस्था
कोरोना महासंकटात समाजाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून करीत आहे. या धोक्याची आणि त्यावर केल्या जाऊ शकणाऱया उपायांची जाणीव संघ कार्यकर्ते लोकांना करून देत आहेत. त्याचवेळी ते स्वतः लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालनही करीत आहेत, असे वक्तव्य त्यांनी समाजमाध्यमांवरून रा. स्व. संघ व त्याच्याशी जोडल्या गेलेल्या इतर संघटनांच्या स्वयंसेवकांना उद्देशून रविवारी केले.
संघाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लॉकडाऊन घोषित होण्याआधीच आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम जून पर्यंत स्थगित केले होते. त्याचप्रमाणे संघ कार्यकर्तेही कामाला लागले होते. मात्र काही समाजघटकांनी सरकारने समाजहितासाठी लागू केलेले निर्बंध झुगारून आपलाच हेका चालू ठेवला आहे. हे निंदनीय आणि क्रोध निर्माण करणारे कृत्य आहे. सरकारविरोधात काही समाजघटकांना भडकाविण्याचे काम काही लोक करीत आहेत, हे सुद्धा निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताचे सर्व 138 कोटी नागरीक आपले बंधू आहेत. ज्यांना साहाय्याची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करण्यासाठी कोणताही भेदभाव न बाळगता स्वयंसेवक कटिबद्ध आहेत. मात्र कोणीही निर्बंध आणि नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास ते घातक ठरेल असा इशाराही त्यांनी समाजकंटकांना दिला.
उद्दिष्टपूर्तीपर्यंत कार्य
कोरोना संपविण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत संघ आणि त्याचे स्वयंसेवक आपले कार्य सुरू ठेवतील. जगाच्या तुलनेत भारतीयांनी परिस्थिती प्रयत्नपूर्वक आणि पुष्कळच समाधानकारक रितीने हाताळली आहे. मात्र काही समाजविरोधी शक्ती या सत्कार्यात अडथळा आणण्याचे काम करीत आहेत. त्यांनी त्यांची नकारात्मक भूमिका सोडावी, अन्यथा त्याचे परिणाम घातक होऊ शकतात. या राष्ट्रीय संकटात एकजूट होण्याचे कर्तव्य सर्वांचेच आहे, असा इशाराही त्यांनी दिला.