प्रतिनिधी/मिरज
नव्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत रात्रीची संचारबंदी सुरू असल्याने मिरज आणि कुपवाड एमआयडीसीत रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या कामगारांची अडवणूक होत आहे. यापैकी काही कामगारांकडे कंपनीचे ओळखपत्र नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात असून, रात्री बारानंतर घरी परतणाऱ्या कामगारांना ओळखपत्र बंधनकारक केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मिरज आणि कुपवाड एमआयडीसीत अनेक कामगार सेकंड शिफ्ट आणि रात्रपाळी शिफ्टला काम करतात. काही कामगार हे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आल्याने त्यांच्याकडे कंपनीचे अधिकृत ओळखपत्र नाही. सध्या रात्रीची संचारबंदी सुरू असल्याने रात्री 11 नंतर पोलीस बंदोबस्त आणि चेकपोस्ट उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रपाळी संपून घरी परत जाणाऱ्या कामगारांची चौकशी होत आहे. परिणामी काही कामगारांकडे ओळखपत्र नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनी आणि कंत्राटदाराने कामगारांना कंपनीचे अधिकृत ओळखपत्र द्यावे. कामगारांनीही रात्रपाळीस कामावर जात असताना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे. ओळखपत्र नसेल तर कारवाई अटळ असल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.