नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अदानी कंपनीने मुंबई एअरपोर्टवर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड तेथून काढून फेकला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या या या कृतीचं समर्थन केलं आहे. शिवसैनिकांनी योग्यच केलं. त्यात चुकीचं काय केलं? असा सवाल करत शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
खासदार संजय राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार प्रसार करत असेल तर शिवसेना सत्तेत असला तरी असले प्रकार खपवून घेणार नाही. काल पाहिलं ना तुम्ही हे असंच होत राहणार, असं राऊत म्हणाले.
तसेच त्यांनी यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात देण्यात आलेल्या शिथिलतेवरही प्रतिक्रिया दिली. पुण्यातला धोका अजूनही संपलेला नाही. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे पुण्याच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसेल. याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच अधिक बोलतील. मुंबईतही लोकल सुरू नाही. रेस्टॉरंट बंद आहे. निर्बंध मुंबईतही आहेत. फक्त दुकानांच्या वेळेत फरक असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.