संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : माचीगड मराठी साहित्य संमेलन उत्साहात
वार्ताहर /खानापूर
मराठी, कानडी भाषा भगिनी आहेत. दोन्ही भाषांना संतांची परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा मानवता, सहिष्णुता शिकविते. संत साहित्यामुळे माणसे जोडली जातात. परंतु मराठी संस्कृतीवर सरकारचे आक्रमण ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे यांनी केले. ते माचीगड, ता. खानापूर येथे रविवारी आयोजित केलेल्या 26 व्या मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे माणसा-माणसात वैरत्व निर्माण झाले आहे. राज्याच्या सीमा धगधगत राहिल्या. हे राजकीय स्वार्थासाठी आहे. देशात बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर राज्यकारभार चालतो. मात्र, कर्नाटक सरकार दहशतीचे वातावरण निर्माण करून मराठी भाषा, मराठी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ग्रामीण भागातील तुमच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे मराठी भाषा कधीच संपणार नाही. राज्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून सीमाप्रश्नाबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
यावेळी संमेलनाचे उद्घाटन म. ए. समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, निरंजन सरदेसाई, उद्योजक रामचंद्र निलजकर पुणे, लक्ष्मण काकतकर पुणे, उद्योजक चंद्रकांत करंबळकर हेब्बाळ, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, प्रमोद कोचेरी,
अॅड. आय. आर. घाडी, उद्योजक शांताराम बडसकर, ग्रा. पं. अध्यक्षा हेमलता कोलकार, उद्योजक शंकर गुरव, नारायण पाटील, दत्ता भेकणे, विन्सेंट डायस, विठोबा मुगवडेकर, निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड आदी उपस्थित होते.
भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांना समाजसेवा रत्न पुरस्कार देण्यात आला. हायस्कूल विभाग आदर्श शिक्षक म्हणून मऱ्याप्पा पाटील तर प्राथमिक विभाग आदर्श शिक्षिका म्हणून कल्पना गाडगीळ यांना पुरस्कार देण्यात आला. दहावीत राज्यात प्रथम आलेल्या प्रणिषा चोपडे तर माचीगड येथील प्राथमिक शाळेत सातवीत पहिला आलेल्या दिप्ती देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
पुस्तकाचे प्रकाशन
संमेलनात संजय वाटुपकर यांचा ‘थवे माणसांचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 26 व्या साहित्य संमेलनानिमित्त प्रगल्भा या विशेषांकाचे प्रकाशन झाले.
प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष पीटर डिसोजा म्हणाले, मराठी साहित्याला चक्रधरापासून परंपरा लाभलेली आहे. ती आजच्या साहित्यिकांपर्यंत सदोदित वाहती राहिली आहे. यामध्ये सर्वधर्मीय साहित्यिकांचा मोलाचा वाटा आहे. मराठी भाषेत शाहू-फुले-आंबेडकर यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे माचीगडसारख्या दुर्गम ठिकाणीही ज्ञानाची गंगा पोहोचली आहे.
इंचभरही जमीन देणार नाही ही कौरवांची भाषा
सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असे वक्तव्य करतात. ही अहंकारी कौरवांची भाषा आहे. ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. सीमाभाग हा पांडव-कौरवांच्या युद्धाचा विषय नसून वीस लाख मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी त्यांचा ध्यास आहे, मराठी त्यांचा श्वास आहे, असे परखड विचार ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
प्रेम कवितेच्या माध्यमातून भूतकाळाच्या आठवणी जाग्या
नामवंत कवींसह नवोदित कवींना लाभले व्यासपीठ
प्रेमात काय असेच असते? असे कवितेतून गाऊन व्यासपीठावरील कवींनी उपस्थितांना एका वेगळ्या भावविश्वात नेऊन ठेवले. कवी कृष्णा पारवाडकर यांनी प्रेमाबरोबरच शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता सादर केली.
यावेळी संदीप मुतगेकर यांनी हा कॉलेजला गेला अन् घोटाळा झाला, ही कविता सादर करून कॉलेजच्या आठवणी सांगितल्या. रमेश पाटील यांनी आकाशाचे चांदणे वेचते ही कविता उत्कृष्ट आवाजात सादर केली.
रूपाली सुळकर हिने माझे गाव कवितेतून माचीगड गावचे महत्त्व सांगितले. आकाश गुरव याने प्रेम कविता गायिली. दिनेश गिरी याने आईचे माहात्म्य सांगणारी माझी कविता सादर केली. संजीव वाटुपकर यांनी आईचा चष्मा तर भरत गावडे यांनी दोन कविता सादर केल्या. अक्षता देसाई हिने छत्रपती शिवाजी महाराजांची महती तसेच यल्लाप्पा कोलकार यांनी कप-बशी ही कविता सादर करून सर्वांना हसविले. श्रोत्यांनीही कविसंमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला.
महिला-विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रंथदिंडी लक्षवेधी
टाळ-मृदंग व अभंगांच्या जयघोषात माचीगड मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. सकाळी 9.30 वा. ग्रंथदिंडीला प्रारंभ करण्यात आला.
माचीगड येथील एकनाथ मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडीचे पूजन म. ए. समिती नेते संभाजी देसाई व मारुती महाराज यांच्या हस्ते झाले. दिंडी श्री सुब्रम्हण्य मंदिराजवळ आल्यानंतर पूजन उद्योजक शिवाजी जळगेकर यांनी केले. अष्टविनायक मूर्तीचे पूजन निवृत्त प्राचार्य पी. के. चापगावकर यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले. गावातून फिरून दिंडी संमेलनस्थळी पोहचली. कै. उदयसिंह सरदेसाई साहित्य नगरीचे उद्घाटन निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते झाले. दिंडी संमेलनस्थळी येताच कै. रामचंद्र शिंदे प्रवेशद्वाराचे उद्घाटन भू-विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी तर कै. डॉ. कोत्तापल्ले सभागृहाचे उद्घाटन डॉ. रफिक हलशीकर यांनी केले. व्यासपीठाचे उद्घाटन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले. संमेलनाचे उद्घाटन म. ए. समिती नेते प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते झाले. अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील, सचिव एम.पी. गिरी व संजय वाटुपकर यांची उपस्थिती होती.
ग्रंथदिंडीत भगव्या पताका घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी सहभागी झाले होते. महिला डोक्यावर कलश घेऊन तर विद्यार्थी मराठी भाषेची महती सांगणारे फलक हाती घेऊन सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीच्या स्वागतासाठी घरांसमोर पताका व रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या.
जादूगार प्रेमानंद पाटील यांच्याकडून प्रयोग सादर
साहित्य संमेलनाच्या चौथ्या सत्रात जादूगार प्रेमानंद पाटील यांनी जादूचे विविध प्रयोग करून तब्बल दोन तास उपस्थितांचे मनोरंजन केले. व्यक्तीच्या शरीराचे दोन भाग करणे, माईंड रायडिंग, अंधश्रद्धा निर्मूलन, भुताचा डान्स, नवीन पद्धतीचे माईंड रायडिंग, रुमाल कट करणे, मेणबत्ती पेटविणे, हवेतून विभुती व तीर्थ आणणे, स्टेजवरून अदृष्य होऊन प्रेक्षकांत प्रकटणे अशा लोकप्रिय प्रयोगांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती अभियान आदी सामाजिक सुधारणांच्या प्रचारासाठी उपयुक्त वेगवेगळे प्रयोगही त्यांनी सादर केले.
ज्येष्ठ साहित्यिक संशोधक प्रा.राजेंद्र केरकर यांचे व्याख्यान
पोर्तुगीजांनी गोव्यात हिंदू संस्कृती संपविण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती जपून ठेवण्याचे काम म्हादई-मलप्रभा खोऱ्यातील लोकांनी केले. नद्यांना, निसर्गाला देवाचे स्वरूप देऊन त्या वाचविण्यासाठी प्रयत्न केला. भजन, नाटकांच्या माध्यमातून भक्ती परंपरा जपल्याची माहिती इतिहास संशोधक प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली.
आज मलप्रभा आणि म्हादईचे अस्तित्व माणसाच्या अतिक्रमणामुळे नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम निसर्गावर होणार असून यामुळे जीवनचक्रच धोक्मयात येणार आहे. यासाठी नद्या वाचविणे गरजेचे आहे. नद्या वाचल्या तर निश्चितच नद्यांच्या खोऱ्यात असलेली संस्कृती व माणसे आणि निसर्ग वाचेल.
मध्वाचार्यांनी गोव्यात वैष्णव सांप्रदायाचा प्रसार केला. त्यामुळे गोव्यातील जनजीवनावर भगवान विष्णूचा प्रभाव आहे. घाटमाथ्यावर उत्तर भारतातून नाथपंथीय या भागात आले. त्यांनी मठांची स्थापना केली. या खोऱ्यात शिवाची भक्ती प्राचीन काळापासून चालत आली आहे. याची साक्ष प्राचीन मंदिरांच्या माध्यमातून दिसून येते. अतिशय घनदाट जंगलात शिवमंदिरांचे आजही अस्तित्व टिकून आहे.
कुंभार्डा, वरकड, माचीगड किल्ला, हलशीची मंदिरे, शिलालेख, अनमोड, दामणगाव जवळचा दगड, या भागातील शिलाखंड, शिलालेखात दैवत पाहण्याची शक्ती आपणाला दिली आहे. भीमगड येथील किल्ला, सत्तरी, देगाव, करंजोळ, पडोसे, तारापूर, कणकुंबी, सडा या भागातील मंदिरे इतिहासाची साक्ष देतात. या भागातील लोक देवतांना मानतात. त्यामुळे या भागात भक्तीमार्गाची उत्तम उदाहरणे पाहावयास मिळतात.
हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला असून या भागातील किल्ले आजही त्यांची साक्ष देत आहेत. हा म्हादई आणि मलप्रभेच्या खोऱ्यातील भाग अनेक राजवटींच्या अंमलाखाली होता. त्यामुळे या भागात विविध संस्कृतींचा संगम झाला आहे.