एके दिवशी संत तुकाराम महाराजांना चालत येत असताना पाहून रस्त्यावरील काही पक्षी धान्याचे दाणे चरायचे सोडून उडून गेले. जेव्हा त्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांना अंतःकरणापासून खूप दुःख झाले. त्यांनी विचार केला, मी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही, तरी मला पाहून पक्षी का उडाले? असा खेद व्यक्त करीत चित्त एकाग्र करून पांडुरंगाला म्हणाले, अवघी भुते साम्य आली। देखिली म्यां कै होती ।।1।। विश्वास तो खरा मग । पांडुरंग कृपेचा ।।2।। माझी कोणी ना धरो शंका । ऐसे हो का निर्द्वंद्व ।। 3।। तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ।।4।। अर्थात सर्व जीव भगवंताचे अंश आहेत, हा अनुभव मला कधी येईल अशी अवस्था झाली म्हणजे पांडुरंगाची खरी कृपा झाली असे विश्वासाने मानता येईल. माझी भीती कुणालाही वाटू नये आणि सर्व विश्व मला निर्द्वंद्व व्हावे. जे जे मला भेटतात ते ते सर्व माझ्या सारखेच भगवंताचे अंश आहेत असे वाटते.
कालांतराने असाच एक प्रसंग पुन्हा एकदा संत तुकाराम महाराजांच्या जीवनात आला. एक शेतकरी त्यांच्याकडे येऊन म्हणाला, ‘माझ्या शेताचे रक्षण कर, पिकांवर नजर ठेव. मी मोबदला म्हणून तुला अर्धा मण धान्य देईल. त्यामुळे तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल.’ शेतकऱयाने सांगितल्याप्रमाणे तुकाराम टेहळणी करण्यासाठी मचाणावर चढून बसले, तेवढय़ात त्यांनी शेतातील पिकांवर अनेक पक्षी येऊन बसल्याचे पहिले. त्यांनी मनात विचार केला ‘हे पक्षी भगवंताचे अंश आहेत, त्यांना भूक लागली म्हणून येथे आले आहेत, त्यामुळे त्यांना हाकलून लावणे योग्य नाही. काही दिवसापूर्वी दुष्काळ पडला होता व कोणालाही खाण्यासाठी अन्न नव्हते, या वषी भगवंताच्या कृपेने भरपूर धान्य पिकले आहे. मी जर पाखरांना हाकलून लावले तर माझ्या हातून फार मोठे पाप घडेल’ म्हणून मचाणावर शांतपणे जाऊन भगवंताचे नामस्मरण करत बसले. दुपारच्या प्रहरी पक्ष्यांना प्रेमाने म्हणाले, ‘तुम्ही पोटभर दाणे खाल्ले असतील तर नदीवर जाऊन पाणी प्या.’ संत तुकारामांनी पक्ष्यांचे जवळून निरीक्षण केले, त्यावेळी त्यांनी पाहिले आणि मनात विचार केला ‘पक्षी जेवढे हवे तेवढे इथेच खातात, घरी काही घेऊन जात नाहीत. पांडुरंगा, माझे हृदय या पक्ष्यांसारखे कधी होईल? हे भगवंता, तुमच्याशिवाय आमची काळजी घेणारा दुसरा कोणी नाही. माझ्या मनातील अहंमन्यता नष्ट करा, मान प्रति÷ा यातून मला मुक्त करा. सोने आणि माती समान दृष्टीने पाहण्याचे ज्ञान मला द्या. माझ्या हृदयामध्ये आपल्या भक्तीशिवाय दुसरी कोणतीही इच्छा येऊ देऊ नका. निंदा व स्तुती समान दृष्टीने पाहण्याची दृष्टी द्या आणि माझ्या मुखामध्ये आपले पवित्र नाम कायम रहावे ही भेट मला द्या’ देहू गावाच्या चारी दिशेकडून पक्षी दाणे खाण्यासाठी येत असत आणि पक्ष्यांचे मनसोक्त दाणे खाताना पाहून तुकारामांना आनंद होत असे.
एक महिन्याचा काळ गेल्यानंतर शेतकरी जेव्हा परत आला तेव्हा त्याने पाहिले की सर्व कणसे धान्य विरहित आहेत, पक्ष्यांनी त्यातील दाणे खाऊन टाकले आहेत आणि सर्व पीक उद्ध्वस्त केले आहे. शेतकऱयांनी तुकारामांना जाब विचारला असता ते उत्तरले ‘मी जर पक्ष्यांना हाकलून लावले असते तर त्यांना उपाशी राहून प्राण गमवावे लागले असते. पक्षी दररोज येऊन दाणे खात पण आपल्याबरोबर एकही दाणा ते घेऊन गेले नाहीत. मग मी त्यांना कसा थांबवू?’
वरील दोन्ही घटनांचा विचार करताना संत तुकाराम महाराज यांच्या दिव्यदृष्टीचा आपल्याला अनुभव येतो. एका सामान्य पक्षाकडून एवढी मोठी शिकवण त्यांनी घेतली. त्यांनी पहिले की पक्षी जेवढे पाहिजे तेवढेच दाणे खातात. त्याचा संग्रह करीत नाहीत. या घटनेवरून सर्व पशु, पक्ष्यी, प्राणीसहित अन्य जीवांची काळजी भगवान श्रीकृष्ण कशी घेत आहेत आणि ते जीवसुद्धा भगवंतावर पूर्णपणे कसे अवलंबून आहेत हे जाणले. त्यांच्या मनात भगवंतावर पूर्ण विश्वास असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा लोभ नाही हेही पाहिले. जर मनुष्यप्राणी तेथे असता तर स्वतः तर खाल्ले असतेच पण दुसरे कोणी यायच्या आत घर भरून धान्य भरून ठेवले असते. यावरून मनुष्याची स्वार्थी, लोभी प्रवृत्ती प्रकट होते. अशा जीवनामध्ये दुसऱयांचे काही का होईना मला मिळते ना यातच सुख मानणारे स्वार्थी, लोभी लोक कधीच संतुष्ट असू शकत नाहीत. त्यांना कितीही दिले तरी त्यांची तृप्ती होत नाही. रावण, हिरण्यकश्यपूसारखे जगातल्या सर्वच वस्तू माझ्याच उपभोगासाठी आहेत, कोणी देत नसतील तर जबरदस्तीने अथवा फसवून त्या काढून घेऊन त्यावर आपलाच मालकी हक्क असल्याचा अहंकार मिरविण्यात अशा लोकांना प्रति÷sचे वाटते. भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 16 व्या अध्यायात अशा स्वार्थी असुरी भाव असलेल्या लोकांबद्दल सांगताना म्हणतात ‘इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध यांच्या आधीन झालेले हे असुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गानी धनसंचय करतात. असुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढय़ मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही, मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन अशा भावनेने असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.’ अशा प्रकारे पशुपक्ष्यांपेक्षाही हीन विचारांची माणसे आपल्याला या जगामध्ये भेटतात. या असुरी प्रवृत्तीची मूळ समस्या आहे की अशा लोकांचा भगवंतावर विश्वास नसतो, म्हणून ते स्वतःच्या ताकदीवर सर्व करण्याचा प्रयत्नात असतात यासाठी वरील सर्व दुर्गुणांचा प्रभाव त्यांच्या जीवनात दिसून येतो.
म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ति असो द्यावें समाधान ।।2।। प्रामाणिकपणे कष्ट करून जेवढे मिळते तेवढय़ात संतुष्ट राहावे. धन, प्रति÷ा, इत्यादी अनित्य गोष्टी संग्रह करणे हा जीवनाचा उद्देश असू नये तर भगवान श्रीकृष्ण कसे सगळय़ा जीवांची काळजी घेत आहेत हे जाणून, आपल्यावर भगवंत किती प्रेम करतात याचा अनुभव साधुसंतांच्या संगतीमध्ये घ्यावा म्हणजे मन कायम समाधानी राहते. यासाठी ‘इषोपनिषद’मध्ये सांगितले आहे, ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्~ तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।। अर्थात ब्रह्मांडातील सजीव किंवा निर्जीव प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या नियंत्रणात आणि मालकीची आहे. म्हणून एखाद्याने स्वतःसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीच स्वीकारल्या पाहिजेत, ज्या त्याच्या भाग म्हणून बाजूला ठेवल्या आहेत आणि इतर गोष्टी कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून घेऊन स्वीकारू नये.’ एखाद्या पक्ष्याला हे समजत असेल तर बुद्धिवान मनुष्यांनी हे ज्ञान समजून घेणे सहज शक्मय आहे. या भावनेने जगल्यास सर्वानाच समाधान प्राप्त होईल.
-वृंदावनदास