अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, सज्ञान्याना साधने करून करून दमल्यानंतर महत्प्रयासाने माझी प्राप्ती होते पण माझ्या भोळय़ा भक्तांना मी अनायासे उद्धरतो. भोळय़ा भक्ताचा उद्धार मी स्वतःच करत असल्यामुळे, त्याला मुळीच प्रयास पडत नाहीत. मी त्याला आपल्या खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्यसिद्धीला पोचवतो. पण तो तेथेही भजनविधि सोडत नाही. खरं सांगायचं तर भोळय़ा भक्ताला पाहून मीच त्याला सामोरा धावत जातो. मी त्याच्या भक्तीला सर्वतोपरी भाळलो असल्यामुळे रात्रंदिवस त्याच्यापाशीच असतो. अशा प्रकारचे जे भोळे भक्त असतात, त्यांना मी उत्तम भागवत मानतो. मी प्रत्यक्ष भगवान असूनही त्यांच्या चरणी लागतो. त्यांच्या भोळय़ा भक्तीचा मी भुकेला असतो. सदासर्वदा सावध राहून त्यांच्या शोधात असतो. त्यांच्यासाठी मी दशदिशांना धावत सुटतो. कारण, उद्धवा भोळा भक्त परम दुर्लभ आहे. शुद्ध चित्ताने केलेले भक्तीयुक्त भजन हेच मुख्य आहे. भाव असतो तेथे भाग्य असते कारण भाव असतो तेथे निःसंशय मी असतो. भाव असतो तेथे विरक्ति असते. तेथे शांति प्रकट होते. आत्मबोध होऊन भक्ति विकास पावते. म्हणून भोळे आणि भावार्थी असतात तेच उत्तम भागवत होतात. आता उत्तम भक्ति कशी असते ते सांगतो. माझ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी उत्तम भक्त त्वरेने धावत जातात आणि त्या मूर्तींची पूजा करण्याची त्यांना मोठी आवड उत्पन्न होते. पण गम्मत अशी की, मूर्तीरूपात त्या ठिकाणी असलेला मी माझ्या भक्तांचं दर्शन घ्यायला तेवढाच उत्सुक असतो कारण माझे भक्त माझेच स्वरूप असतात. मी आणि ते एकरूपच असतो. कृपणाचे चित्त जसे धनासाठी उत्कंठित होते, त्याप्रमाणे माझे चित्त त्यांच्या भेटीसाठी अगदी उत्कंठित होऊन राहते. त्यांना माझ्या मूर्तीपेक्षाही संतांच्या भजनात अत्यंत संतोष असतो. घरदार सोडून साधूंची संगत करण्यातच त्यांना अतिशय सुख वाटते. चिंतामणीला जसे जतन करून ठेवतात, त्याप्रमाणे ते सज्जनांची मर्यादा राखण्याविषयी जपत असतात आणि नित्यनवे अधिक अधिकच भजन करतात. पूजा करताना तर त्यांचे मन तृप्तच होत नाही. पूजेचे साहित्य करून मोठय़ा साक्षेपाने माझी पूजा करतात. संत मला अतिशय प्रिय असतात. माझी पूजा करत असताना कोणी संत घरी आल्यास त्यांची पूजा आधी करावी असे माझे म्हणणे आहे असे न केल्यास मला राग येतो. संतांचे जे सेवक असतात त्यांचे मनोरथ मी पूर्ण करतो. मला निरिच्छाला सुद्धा संतांची इच्छा आहेच. माझे पूजाध्यान सोडून जो संतांना लोटांगण घालतो, त्याने कोटियज्ञांचे फळ मला अर्पण केले म्हणून समजावे. संतांची पूजा करणाऱयानेच सर्व तीर्थात स्नान केले व त्यानेच जपतपांची फळे मिळविली असे समजावे. ज्याने सन्मानपूर्वक साधूला नमस्कार घातला. त्याच्या हाती सर्व पूजांचे सार आले असे समज. माझ्या प्रतिमा असतात त्या अचेतन मूर्ति असतात पण संत ह्या माझ्या सचेतन (चालत्या बोलत्या) मूर्ति आहेत. पूर्ण श्रद्धा धरून त्यांची भक्ति केली असता, ती नक्की मला पावते. प्रतिमा ह्या आपल्या कल्पनेप्रमाणे उत्तम केलेल्या असतात परंतु संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तमच आहेत. ते चालतेबोलते परब्रह्मच होत. ह्याकरिताच साधुसेवा अतिउत्तम होय. माझ्या मूर्ति आणि सत्पुरुष ह्यांचे अशा रीतीने उत्तम भक्त तत्परतेने भजन करतात. आता उत्तम भजनाचा प्रकार ऐक. माझी प्रतिमा आणि सोज्ज्वळ साधु यांना ज्यांचे डोळे आवडीने पहात नाहीत, त्यांना दृष्टि असूनही त्यांचे डोळे केवळ मोरांच्या पिसांच्या डोळय़ाप्रमाणे आंधळे होत. ज्याप्रमाणे स्त्रिया, पुत्र व संपत्ति पाहुन डोळय़ांना सुख वाटते, त्याप्रमाणेच तो आवडीने संतप्रतिमांचे दर्शन घेतो. त्याचे ते संतांचे अतिउत्कंठतेने दर्शन घेणे हाच माझ्या दृष्टीने देखणेपणा होय. त्यानेच नेत्रांचे सार्थक होते असे समज. अशा रीतीने नेत्रांकडून भजन घडते. संत हे माझ्याच मूर्ति आहेत अशा कल्पनेने त्यांच्याकडे पाहून तो मोठय़ा उत्कंठेने धावत जाऊन आवडीने त्यांना आलिंगन देतो आणि आनंदाच्या भराने घातलेली मिठी सोडीत नाही. असे संतांचे आलिंगन घेतले असता त्याच्या योगाने सर्व अंगच पावन होते.
क्रमशः