सांगली/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील काही कारखाने ऊस गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीला लागले आहेत मात्र जिल्ह्यात अजूनही सुमारे 15 ते 20.टक्के म्हणजेच 20 ते 25 हजार हेक्टरवरील ऊसतोड होणे बाकी त्यामुळे संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत अन्यथा कारखाने सुरू ठेवावेत म्हणून आंदोलन करावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
खराडे म्हणाले मिरज, वाळवा, पलूस, कडेगांव, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी जत या सर्वच तालुक्यातील उसाचे क्षेत्र लाख ते सव्वा लाख हेक्टरवर आहे त्यातील सुमारे एक लाख हेक्टर वरील उसाचे गाळप झाले आहे वरील 20 ते 25 हेक्टर वरील ऊस अद्याप बाकी आहे.
ताकारी म्हैशाळ टेंभू आरफळ, विसापूर पुणदी योजना सुरू झाल्यामुळे दुष्काळी जत कवठेमहांकाळ तासगाव आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात ऊसाची शेती वाढली तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील पाच कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊस गाळप झालेला नाही. त्यामुळे ऊस शिल्लक राहण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही या पूर्वीच ही बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यामुळे त्यांनी सर्व कारखान्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या तरीही कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता करण्याची तयारी सुरू केली आहे. एका कारखान्याने 31 मार्चला कारखाना बंद करण्याचे जाहीर निवेदन दिले आहे.
या बाबतीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची बैठक घेवून ऊस संपेपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशा स्पष्ट सूचना नव्हे आदेश द्यावेत, अन्यथा जे कारखाने बंद करतील त्या साखर कारखान्याचा अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला.