जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांची अधिकारी वर्गास सूचना – जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली पूर्व खबरदारी बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच सर्व पूर्व खबरदारी घेण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी केली. मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करण्याची सूचना केली तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायत क्षेत्रात आवश्यक ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात यावी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकारी वर्गाने अधिक गंभीरपणे सूचनांचे पालन करून कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टीचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे . या बरोबरच शहरातील ज्या नागरिकांची तळघरात वीज मीटर आहेत त्यांनी तात्काळ पहिल्या मजल्यावर वीज मीटर जोडून घ्यावे अन्यथा अशा नागरिकांची वीज संपर्क तोडण्यात यावा अशी सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केली आहे . महाराष्ट्रातून मागील वर्षी कृष्णा नदीतून अतिरिक्त पाणी सोडल्याने या नदीकाठावरील गावांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत महाराष्ट्र शी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, महापालिकेचे आयुक्त जगदीश के. एच. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.