सहित्यिक महादेव मोरे यांचे प्रतिपादन ः सार्वजनिक वाचनालय आचार्य अत्रे साहित्य पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी / बेळगाव
आचार्य अत्रे हे केवळ एक लेखक नव्हते तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा ही मागणी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लावून धरली. आचार्य अत्रे, न्यायमूर्ती डांगे व एस एम. जोशी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा सर्वदूर पसरला. अत्र्यांनी आपल्या लेखणीतून तडाखेबाज लेखन करत अनेकांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे अत्र्यांच्या लेखणीचा माझ्यावर प्रभाव पडला, असे विचार निपाणी येथील साहित्यिक महादेव मोरे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय बेळगाव आयोजित आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारल्यानंतर महादेव मोरे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. रमेश साळुंखे, नानासाहेब जामदार, वाचनालयाचे कार्यवाह रघुनाथ बांडगी, लता पाटील, माजी अध्यक्ष गोविंदराव राऊत उपस्थित होते. गोविंदराव राऊत यांच्या हस्ते साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आचार्य अत्रे यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारण्याची ही तिसरी वेळ आहे. निपाणी, कोल्हापूर या सीमावर्ती भागातील तंबाखू कामगार, शेतकरी, ऊसतोड कामगार, जोगते, गिरणी कामगार यांच्या व्यथा लेखणीतून मांडल्यामुळेच परिघाबाहेरचे लिखाण करता आले. आपले लेखन सर्वांपेक्षा वेगळे असेल तर ते कुठेही छापले जाते. याचा आम्हाला अनुभव आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनंत लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लता पाटील यांनी आभार मानले.