सुरक्षा परिषदेत भाषण केल्याचा खोटा दावा : सुरक्षा परिषदेत बोलण्याची संधीच पाकिस्तानला मिळालेली नाही
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघातील स्वतःच्या स्थायी मिशनच्या संकेतस्थळावर खोटा दावा केल्याचे जगजाहीर झाले आहे. सुरक्षा परिषदेत भाषण केल्याचे पाकिस्तानने नमूद केले होते, परंतु पाक प्रतिनिधीने दहशतवादावर कुठलेच भाषण केले नव्हते. सोमवारी आयोजित ऑनलाईन बैठकीसाठी पाकिस्तानचा वक्त्यांच्या यादीतच समावेश नव्हता.
संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या विरोधातील स्वतःच्या मोहिमेसाठी समर्थन प्राप्त करण्यास अपयशी ठरलेला पाकिस्तान सुरक्षा परिषदेसाठी एक चुकीची नोंद तयार करताना पकडला गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात बनावट सामग्री मांडणे, खोटे दावे करणे ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. 2017 च्या महासभेत पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी गाझापट्टी येथील जखमी पॅलेस्टिनी मुलीचे छायाचित्र दाखवून ती काश्मिरी मुलगी असल्याचा दावा केला होता. लोधी यांच्या या कृत्यामुळे पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली होती.
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीने स्वतःचे भाषण कुठे केले हे समजून घेता आलेले नाही. सुरक्षा परिषदेची बैठक बिगरसदस्यांसाठी खुली नव्हती, असे भारताच्या मिशनने स्पष्ट केले आहे. बनावट भाषणात भारताच्या विरोधात आरोप करण्यात आले होते. पाकिस्तानी प्रतिनिधी अक्रम यांचे बनावट भाषण ट्विटरच्या माध्यमातून प्रसरित झाले आहे. या कथित भाषणात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि जमात-उल-अहरारला भारतातूनच पाठिंबा मिळत असल्याचा आणि नवी दिल्ली भाडेकरू दहशतवाद्यांचा वापर करत असल्याचा बेछूट आरोप करण्यात आला होता.
हास्यास्पद आरोप
दहशतवादाचा पुरस्कर्ता असलेल्या पाकिस्तानने भारतावर केलेला आरोप हास्यास्पद आहे. पाक प्रतिनिधीच्या बनावट भाषणात संयुक्त राष्ट्रसंघाने 4 भारतीयांवर बंदी घातल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीची यादी सार्वजनिक असून यात भारतीय सामील नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तानात 40,000 दहशतवादी
सुरक्षा परिषदेची समिती पुराव्यांच्या आधारावर काम करते. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात 40 हजारांपेक्षा अधिक दहशतवादी असल्याचे महासभेतच मान्य केले होते. पाकिस्तानने अल-कायदाचे अस्तित्व संपुष्टात आणल्याचा दावा अक्रम यांनी केला आहे. परंतु अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानाच आश्रयाला होता. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे प्रमाण 23 टक्क्यांवरून आता केवळ 3 टक्क्यांवर आल्याचे भारताने सुनावले आहे.