ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाची धग आता तीव्र झाली आहे. किव्ह ताब्यात आल्यानंतर अन्य ठिकाणी ताबा मिळवण्याचा रशियाचा इरादा आहे. त्यामुळे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरोधात अमेरिकेने सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. यात भारताने तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे रशियाला पाठिंबा असल्याचे सूचित केले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियानं युक्रेनवरील हल्ले थांबवून सैन्य माघारी बोलवावे, यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला 15 पैकी 11 देशांनी मतदान केले. 11 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला तर 3 देश तटस्थ राहिले. अनुपस्थित राहणाऱ्यांमध्ये भारत, चीन, यूएई हे देश होते. तर रशियाने प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला.
भारत इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक समतोलाचा आदर करतो. युक्रेनमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे भारत अस्वस्थ आहे. हिंसा आणि शूत्रत्व तात्काळ संपवायला सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत काही तोडगा निघाला नाही. आम्ही भारतीयांच्या सुरक्षेसाठी चिंतेत आहोत. युक्रेनमध्ये मोठय़ा संख्येने भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे, असे भारताचे सुरक्षा परिषदेतील राजदूत टी. एस. तिरूमूर्ती यांनी म्हटले आहे.