अध्याय दहावा
कोणी मनापासून परमार्थ साधना करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न कर्मवादी करतात. ते म्हणतात, समोर दिसते ते विश्व खोटे आणि न दिसणारा ईश्वर खरा हे कधीतरी शक्मय आहे का? तेव्हा काहीतरी कल्पना करून घेऊन जीवनाचा आनंद घालवून टाकू नका. भरपूर कर्म करा आणि फळाचा उपभोग घ्या. स्वर्गादि लोक त्यासाठीच आहेत असे वेद सांगतात. ते काय खोटे असेल का? कर्मवाद्यांचे म्हणणे खोडून काढताना भगवंत म्हणाले, उद्धवा कर्मवाद्यांचे म्हणणे क्षणभर खरे मानले तर जगात कुणी दुःखी व्हायलाच नको पण तसे दिसत नाही. उलट दुःख नको असताना माणसाला दुःख भोगावेच लागते म्हणजेच तो स्वतंत्र नसून पराधीन आहे आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो. जीव नुसताच परतंत्र आहे असे नाही तर स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्याला काळाच्या स्वाधीन व्हावे लागते आणि तो काळ त्याला पुनः पुन्हा गर्भवासात घालतो.
जीव नेहमीच दीन, बापुडवाणा असतो. कर्मे तर करतो पण त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो. तोच त्याला सुखदुःखे भोगवितो हे लक्षात ठेव. म्हणून ईश्वरी सत्ता हीच सर्वश्रे÷ आहे. दुःख व्हावे अशी मनापासून कोणीच इच्छा करीत नाही पण दुःख हे इच्छा न करताही प्राप्त होते. यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की, ज्यांना ज्यांना यथासांग कर्म करणे कळत नाही, तेच जीव दुःखी होतात.
आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात. जे सदाचारसंपन्न असतात, ते इहपरलोकासाठी यथासांग कर्म करतात. कर्मवाद्यांच्या या मुद्यावर भगवंत म्हणतात कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते, त्याला सुखाचा उपभोग नेहमी घ्यायला मिळतोच असेही नाही. जे कर्माचे खरोखर ज्ञाते असतात तेही येथे दुःखी असलेले दृष्टीस पडतात आणि जे कर्माला शिवतसुद्धा नाहीत, ते लोकही सुखी असल्याचे दिसतात. यज्ञपुरुष जो अच्युत असा ईश्वर त्याला सोडून जे अग्निहोत्री यज्ञ करतात त्यांचे स्वकर्मच त्यांना दुःख देते. मी सर्वव्यापक आहे पण माझेच अस्तित्व नाकारून अनिश्वरवादी लोक यज्ञ करतात. तोच त्यांना बंधक होतो. पूजेची सर्व तयारी यथासांग करतात पण मुख्य जो मी त्यालाच डावलल्यामुळे पूजेतले पावित्र्यच निघून जाते. असे करणाऱयांची बुद्धी कोती असून ते सकाम कर्म करत असतात. कर्म मला अर्पण न करता पुण्य संपादन करणे हेच पाप असून दुःखदायक असते. विषाला अमृत म्हणावे तसेच हे आहे. मला न मानता स्वर्ग मिळविणे आणि भोग भोगणे हाच मोठा रोग समजावा. या लोकांना माझे महत्त्व कळत नाही किंवा कळून सवरून ते त्याकडे दुर्लक्ष करतात. अरे माझ्या नामाचे सामर्थ्य असे आहे की कर्म करताना जर त्यात काही न्यून पडले तर तेथे माझे स्मरण करावे म्हणजे त्या नामानेच त्यातील न्यून पूर्ण होते पण याकडे दुर्लक्ष करून ते मला यज्ञपुरुषाला सोडून इंद्रादि देवांचे भजन करतात! पण ते इंद्रादि देव माझ्याच आधीन आहेत, हे त्यांना कळत नाही. हेच त्या कर्मातील वैगुण्य होय. जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत त्यांचे दैवच फुटके म्हणून समजावे. तसे करण्याने इहलोकी दारिद्य्रात कुचमावे लागते आणि परलोकालातही विघ्न येते. मला यज्ञपतीला चुकवून जे यज्ञयाग करतात त्या यज्ञाला, बालविधवेला गर्भप्राप्ती झाल्याप्रमाणे फळे येतात! दुसऱयाच्या द्रव्याने यज्ञ करणारे याज्ञिक त्यातल्या चुकीचे धनी होतात आणि पैसे देणारे पुण्य घेऊन जातात. तात्पर्य कर्मामध्ये निष्णात असूनही सकाम कर्म करून याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात.
आता पुढील गम्मत ऐक, ज्याना कर्मच माहीत नसते ते परमसुखाचा उपभोग घेतात. त्यांना कर्माचा खटाटोप माहीत नसतो पण त्यांच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा मात्र निस्सीम असते. त्यामुळे ते कोटय़वधी दुःखातून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात. जी जी गोष्ट सुखदायक आहे असे कर्मवादी सांगतात ती प्रत्येक गोष्ट शेवटी दुःखदायक होते. त्यात सकाम कर्माचा क्रमांक सगळय़ात वरचा आहे हे लक्षात ठेव.