मंत्री विश्वजित राणे यांचे व्टिटद्वारे निवेदन
प्रतिनिधी/ पणजी
मेळावली प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे बॅकफुटवर येण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस चिघळत असलेल्या आंदोलनास गोवाभर मिळत असलेल्या प्रतिसादानंतर तसेच काही सल्लागारांनी त्यांना दिलेल्या सल्ल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी व्टिटद्वारे आपण सत्तरीतील जनतेबरोबर आहे, असे निवेदन केले तसेच आपण मुख्यमंत्र्यांबरोबर या प्रकरणी चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितल्याचेही निवेदन केल्याने आयआयटी प्रकरणातून ते माघार घेणार अशीच चिन्हे दिसत आहेत.
एका नाटय़मय घडामोडीनंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे सत्तरीतील शेळ मेळावली येथे होऊ घातलेल्या नियोजित आयआयटी प्रकल्पापासून फारकत घेणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेले दोन दिवस मंत्री राणे हे फार अस्वस्थ आहेत. सत्तरीत शेळ मेळावली प्रकरणी आपल्या सल्ल्याबाहेर तेथील नागरिक जाणार नाहीत असे त्यांना वाटत होते. मात्र ग्रामस्थ एकसंध राहिले. त्यातच एकामागोमाग एक सत्तरीतील गावांतील मंडळी आयआयटी विरोधातील आंदोलनास पाठिंबा देऊ लागल्यानंतर कधी नव्हे ते प्रथमच विश्वजित राणे यांच्यासमोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीची विधाने सुरु
या प्रकरणी गेले काही दिवस गप्प राहिलेल्या आरोग्यमंत्र्यांनी सारे काही सहन केले. आंदोलकांनी जेवढा जास्त गोंधळ सुरू केला असता मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जास्तीत जास्त चितावणी देणारीच निवेदने केल्याने ग्रामस्थ अधिक रागानेच रस्त्यावर आलेले आहेत. आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होत गेले. दरम्यान दोन सहकारी मंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना या प्रकणापासून फारकत घ्या, अन्यथा अडचणीत याल, असा सल्लाही दिला. शिवाय ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री तथा विश्वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे यांनी देखील वडिलकीच्या नात्याने दिलेला सल्लाही आरोग्यमंत्र्यांना उपयोगी पडला. आणि त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला व नंतर तो मागे घेतला.
वाढत्या आंदोलनाने आरोग्यमंत्री अस्वस्थ
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यास 1 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी तानावडे यांचे अभिनंदन केले व त्या दरम्यान दोघांमध्ये झालेल्या चर्चेअंती या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिले. आरोग्यमंत्री शेळ मेळावलीच्या वाढत्या आंदोलनाने प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. सध्या ते आपल्या मतदारसंघात मोकळेपणाने फिरू शकत नाहीत. शेळमेळावली प्रकरणी जेवढे आंदोलन वाढत जाईल, तेवढा फटका आरोग्यमंत्र्यांनाच बसण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्र्यांनी 3 तासामध्ये तीनवेळा व्टिट केले त्यात आपण मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेऊन चर्चा करणार असे म्हटले आहे. तसेच आपण सत्तरी आणि उसगावच्या जनतेबरोबर आहे, असे सूचक विधान केलेले आहे.
विश्वजित राणे हे या प्रकरणी माघार घेण्याची शक्यता गृहित धरून भाजपमध्ये राजकीय नाटय़ही रंगताना आरोग्यमंत्र्यांनी सत्तरीतील जनता हीच माझी शक्ती आहे, असे जाहीर करून भाजपला धक्का दिला. दरम्यान भाजपच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार कोअर समितीनेही मुख्यमंत्र्यांना निवडणूक वर्षात असे काही करू नका असा सल्ला दिलेला आहे. या प्रकाराने कधी नव्हे एवढी भाजपची बदनामी होत आहे व ती केवळ गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी होत असल्याचे मत मांडले आहे.
सरकारची भूमिका आता सौम्य !
सोमवारी सर्वत्र पोलीस पहारा वाळपईत व मेळावलीत वाढविण्यात आला खरा, परंतु पोलिसांना कोणताही कठोर निर्णय घेऊ नका असे सांगितले होते. त्यामुळेच मेळावलीला पाठिंबा देण्यासाठी म्हावशी या सत्तरीतील गावातील मंडळी वाळपईत पोहोचली तेव्हा त्यांनी पोलिसांचे कडे तोडून मेळावली गाठली. बऱयाच ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली व आता सर्वेक्षणाची कामही थोडे दिवस बंद राहिल असा अंदाज आहे.