पंतप्रधान मोदींकडून ‘मन की बात’मध्ये आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारची प्रत्येक कृती ही सर्वसामान्यांच्या हितासाठीच आहे. आपल्याला लोकांचे आशीर्वाद सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी हवे आहेत, असे भावोत्कट उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात काढले. आकाशवाणीवरुन देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात त्यानी विविध मुद्दय़ांना स्पर्श करत आपल्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि रालोआ सरकार सलग दुसऱयांदा सत्तेवर येऊन आता अडीच वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही ‘मन की बात’ महत्वाची मानली जात आहे. ही ‘मन की बात’ या कार्यक्रमाची 83 वी आवृत्ती होती.
युवक हे या देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या. स्टार्टअप योजना ही सर्वात यशस्वी ठरलेली आहे. या योजनेमुळे नवे तंत्रज्ञान आणि असंख्य रोजगार निर्माण झाले आहेत. ही योजना भारताचा आधारस्तंभ बनत आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी या योजनेसंबधी काढले.
पर्यावरण संरक्षण महत्वाचे
आपले अस्तित्वच पर्यावरणाच्या सुरक्षेवर टिकून आहे. सरकारने त्यामुळे पर्यावरण संरक्षणाला अधिकतर प्राधान्य दिले आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम लागू केला आहे. त्याला सर्वसामान्यांकडून प्रतिसाद मिळत आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी जालौन जिल्हय़ातल्या कोरडय़ा पडलेल्या नून नदीच्या पुनरुज्जीवनाचे आणि त्यामुळे झालेल्या शेतकऱयांच्या हिताचे उदाहरण दिले.
ड्रोन नियमांमध्ये सुलभता
ड्रोन तंत्रज्ञानाचा सध्या झपाटय़ाने प्रसार होत आहे. याचे उपयोग अनेक आहेत. पूर्वी यावर बरीच कठोर नियंत्रणे होती. त्यातील अनावश्यक नियंत्रणे आता काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे दुर्गम भागांमध्ये औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविणे आता या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे, अशी भलावण त्यांनी केली.
लसीकरणाचे कौतुक
भारताने कमीत कमी वेळात किमान 100 कोटी लोकांना कोरोना लसीची एकतरी मात्रा देण्याची व्यवस्था केली. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हे कार्य आव्हानात्मक होते. आपल्या कोरोना वीरांनी, संशोधकांनी आणि डॉक्टरांनी ते यशस्वीरित्या पेलले आहे. यासाठी सारा देश अभिनंदनास पात्र आहे. याशिवाय भारताने नेहमीच जगात शांतता नांदावी असे प्रयत्न केले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत भारताचे योगदान मोलाचे आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.