रेडिओवर, टीव्हीवर एक फार भावविभोर गाणं बहुतेकांनी ऐकलं असेल. बाबूजींचा भावनार्द आवाज, त्याला सुरेल कोरसची साथ, म्हटलं तर समूहगीत आणि म्हटलं तर वैयक्तिक, म्हटलं तर भावगीत आणि म्हटलं तर अगदी शालेय परिपाठय़ गीत. ज्ञानमंदिराची महती गाणारं हे गीत कित्येक शाळांचं अतिशय लाडकं आहे. परिपाठात आवर्जून म्हटलं जातं. कितीतरी मोठमोठी माणसं हे गीत ऐकल्यावर शाळेच्या आठवणीने गहिवरतात. साहजिक आहे की शाळेत गेल्यावर संगीताचे जे पहिले संस्कार होतात त्यांची सुरेल आठवण म्हणजेच हे सदाबहार गाणं! कुठलं म्हणून विचारायच्या आत सांगते.
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
त्या ज्ञानाचे मंदिर हे.
सत्य शिवाहुन सुंदर हे! आहे ना हे गाणं खरंच प्रभावी? ’ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटातलं हे जगदीश खेबूडकर यांचे गाणं चित्रपटगीत म्हणून लक्षातच नसेल आता आपल्या. पण शाळेतल्या संगीताच्या तासाचं नातं मात्र अभंग असेल अजून त्याच्याशी. आता हे शाळेचं काय काढलं म्हणाल तर आपण मनापासून गाणं, धांगडधिंगा करत नाचणं पहिल्यांदा कुठे करतो आपण? तर शाळेत. निसर्गतः माणसाला व्यक्त व्हायचं असतं. आनंद झाल्यावर गाणं नि नाचणं हे अगदी स्वाभाविक आणि सगळय़ांनाच लागू आहे. म्हणूनच बाथरूम सिंगर ही जमात भक्कमपणे टिकून आहे.
जेव्हा आपला सूर लागतो
बाथरूममध्ये न्हाताना
भरली बादली डुलू लागते
आपण गाणं गाताना.
असं पाडगावकर म्हणून गेलेत ते उगीच नाही. लहान मूल जेव्हा बोबडय़ा बोलीत गाणं गातं तेव्हा तो त्याच्या अभिव्यक्तीचा आविष्कार असतो. बंधनरहित अभिव्यक्ती हे गाण्याचं मूळ आहे. अंगाई, अडगुलं मडगुलं म्हणतानाच गाणं जे आयुष्यात सुरू होतं ते पुढे वाढतच जातं. त्याचं पहिलं सादरीकरण होतं ते शाळेत. मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येणं, उत्कटपणे व्यक्त होणं यासाठी मदत करतं ते संगीत. अगदी अंगणवाडीतली मुलं पहा. नुसते उत्साहाचे झरे होऊन वाहत असतात. नर्सरी ऱहाइम्सवर नाचत असतात. एकमेकांना टाळय़ा देत गाणं म्हणतात. फेर धरून नाचतात. तेव्हा नकळतच ती गायन, नृत्य, नाटय़ आणि समूह वर्तन याचा एकदमच अभ्यास करत असतात. माझ्या लहान मुलाला गाडीवर बसल्यावर पाढे गाणं म्हणून शिकवायची सवय त्याच्या वडिलांनी लावली. परिणामी जे गणित म्हणून झालं नसतं ते गाणं म्हणून सहज होऊन गेलं. ज्यावेळी वेडंवाकडं का असेना पण मूल गातं तेव्हा तो आविष्कार स्वतंत्र असतो. स्वतःचा असतो. त्यांना जे सांगता येत नाही ते बाहेर पडतं. कारण प्रत्येकाचं आकलन वेगळं आणि त्याचमुळे कथनही वेगळं होतं. आपले अनुभव विचार सुंदर पद्धतीने व्यक्त करायला संगीत मदत करतं आणि अमूर्त बुद्धिमत्तेचा मोठय़ा प्रमाणावर विकास होऊ लागतो. शाळेच्या अभ्यासक्रमात संगीत हा विषय अनिवार्य असतो खरं तर. पण तो? किती मनापासून शिकवला जातो हे त्या शिकवणाऱयांना आणि शिकणारांनाच माहित. शाळा व्यवस्थापन समिती ते विद्यार्थी.. सगळेच निरुत्साही.. पण काही शाळा हा उपक्रम मनापासून राबवताना दिसतात. आमच्या देवगडच्या म.ग. हायस्कूलला तर संगीत विभागाची खूप जुनी परंपरा आहे. आणि ती ते अभिमानाने वागवतात. संगीत या विषयात मुलांना काय काय शिकवतात म्हणून सांगू? मला जर असं लहानपणी शिकायला मिळालं असतं तर किती मज्जा आली असती असं वाटत रहातं. प्रथम पायाभूत स्वर शिकवतात. ठेके शिकवतात. मुलं छोटी सोपी गाणी गातात. समूहगीत म्हणतात. शाळेच्या प्रार्थना बसवतात. सगळं काही करतात. त्यांना रागांची आणि तालांची ओळख करून दिली जाते. लक्षणगीतं, सरगम सगळं काही शिकवलं जातं. आणि शेवटच्या टप्प्यात बंदिशींचं उत्तम सादरीकरण करण्याइतपत तयारी करून घेतली जाते. माझ्यासाठी ही नवीन माहिती आहे. हे किती सुंदर! म्हणजे गाण्याच्या परीक्षा मुद्दाम देणाऱया माणसाला जर विद्यार्थी असतानाच इतका अभ्यास करायला मिळाला तर कॉलेज संपायच्या आतच तो विशारद होऊन जातो. आणि संगीताच्या विशाल अवकाशात झेप घेतो. इतका सगळा बदल शाळेत पद्धतशीरपणे शिकवल्या जाणाऱया संगीत या विषयामुळे घडतो.
याचा फायदा इतका सुखद आहे की विद्यार्थ्यांच्या जाणिवा लहान वयातच बदलतात. त्यांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. शाळेत मुलं जास्तीत जास्त फिरतात ती संगीत शिक्षकांच्या मागे. त्यांनाही नकळत ती उत्तम कलाविष्कार करत जातात. त्यांना व्यक्त होण्याची शिस्त लागते. त्यांची स्टेजची भीतीही जाते. स्मरणशक्ती वाढते. आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीच्या सांगितिक वारशातही भर पडत जाते. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांना शिकवणाऱयाचा भरपूर रियाज होऊन तो शिक्षक आणि त्याचं गाणंही अधिकाधिक प्रगल्भ होत जातं. संगीत पंचमो वेद: असं म्हटलं जातं कारण की ते तितकं ग्रेट आहेच. पण समाजाला गाणं देणारी माणसं घडविली जातात ती शाळेत प्रेमाने शिकवल्या जाणाऱया संगीत विषयामुळे. त्यामुळे संगीत शिकवणाऱया आणि कलाकार घडवणाऱया सर्वच शिक्षकांना माझा आदराने नमस्कार!
अपर्णा परांजपे-प्रभु