मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नाराजी
बेळगाव / प्रतिनिधी
ऐन हिवाळय़ात शहराच्या काही भागातील पाण्याचा पुरवठा बंद आहे. तर दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या 20 दिवसांपासून सदाशिवनगर व विश्वेश्वरयानगर येथील मेन रोडवर जवळ जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा मंडळाचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे.
जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. सदाशिवनगर व विश्वेश्वरयानगर मेन रोड जवळील जलवाहिनीला लागलेल्या गळतीकडे मात्र पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने रस्त्यावर पाणी वाहत आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून जलवाहिनीची गळती थांबणार कधी असा सवाल देखील स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे. रस्त्यावरच पाणी वाहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्यावर सतत पादचाऱयांबरोबर वाहनधारकांची ये-जा असते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे महापालिकेच्यावतीने पाणी अडवा पाणी जिरवा असे सांगून पाणी बचतीसाठी आवाहन केले जाते. तर दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडूनच या आवाहनाकडे दुर्लक्ष झाले आहे. दररोज शहरात कुठे ना कुठे? जलवाहिन्यांना गळती लागून हजारो पाणी वाया जाण्याचे प्रकार घडत असतात. मात्र याबाबत पाणीपुरवठा विभाग उदासीन असल्याचे दिसून येते.