डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. विश्वंभर चौधरी यांचे मत
वार्ताहर/ निपाणी
येथील डॉ. आंबेडकर विचार मंचच्यावतीने मराठा मंडळ सांस्कृतिक कार्यालय येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले. रविवारी झालेल्या या विचार संमेलनासाठी समतेच्या चळवळीत माझी भूमिका या विषयावर मुक्त चिंतन झाले. यामध्ये बोलताना प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. विश्वंभर चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना देशात समता निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संगम व्हायला हवा, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
विचार संमेलनाची सुरुवात बुद्ध विचार मंचच्यावतीने बौद्ध वंदना करुन करण्यात आली. अमित शिंदे यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते समता ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी गेल्या 20 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. आत्मभान असणारा तरुण निर्माण करणे हेच ध्येय आहे. परिवर्तनाचे कार्य करताना कधीही राजकीय उचलेगिरी करण्याचे काम डॉ. आंबेडकर विचारमंचने केलेले नाही व यापुढेही करणार नाही, असे स्पष्ट सांगितले. संमेलनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यासाठी योगदान दिलेल्या राजेश कदम, उत्तम पाटील, प्रा. डॉ. अच्यूत माने, डॉ. श्रीकांत वराळे, ऍड. अविनाश कट्टी, मल्लेश चौगुले, सुरेश तळवार यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, सन 1927 मध्ये मनूस्मृतींचे दहन करण्यात आली. हीच राज्यघटनेची पायाभरणी होती. सध्या महिलांना समान हक्क दिल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात मात्र कोठेच कृती होताना दिसत नाही. विषमतेने भरलेली मनूस्मृती प्रातिनिधीक स्वरुपात जाळून टाकण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. समतेचा आजचा राष्ट्रवाद आव्हान बनून रचनेला नाकारतो आहे. सध्या स्थितीचा पूर्ण विचार करता आताचे चांगले नाहीत. घटनात्मक राष्ट्रवादाला सांस्कृतिक राष्ट्रवादवाल्यांचे आव्हान निर्माण होत आहे. राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाला विरोध करणाऱयांच्या हाती राष्ट्रीय सत्ता गेली आहे. राजकारण व समाजकारण यात वेगळे असे काहीच नाही. निवडणुकीत उमेदवार म्हणून अनेकजण सहभागी नसतात पण मतदानातून राजकारणात प्रत्येकजण सहभागी असतो.
यावेळी माजी आमदार काका पाटील, प्रा. सुभाष जोशी, रोहन साळवे, विलास गाडीवड्डर, जि. पं. सदस्य जयवंत कांबळे, बाळासाहेब देसाई-सरकार, प्रताप मेत्राणी, मोहन बुडके, युवराज पोळ, पिंटू माने, अविनाश माने, प्रवीण माने, सुशांत खराडे, अशोक लाखे, गणू गोसावी, किसन दावणे, रतन पोळ, आरेस सनदी, सुधाकर माने, प्रा. बाबासाहेब आवटे, प्रशांत मधाळे यांच्यासह डॉ. आंबेडकर विचार मंचचे सदस्य, नागरिक, महिला उपस्थित होत्या. मिथून मधाळे, दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुशांत खराडे यांनी आभार मानले.