मनुष्याची निर्मिती कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मानवप्राणी जेव्हापासून एकत्र नांदायला लागला आहे तेव्हापासून निश्चितच कुटुंबसंस्था उदयास आली असावी हे सांगता येऊ शकते. प्राचीन-अर्वाचीन काळी किंवा अश्मयुगातही कुटुंब ही संकल्पना निर्माण झाली असावी. त्याकाळी नव्यानेच मानव संस्कृतीची सुरुवात पृथ्वीतलावर झाल्याने एकाच कुटुंबात अनेक सदस्य असतील किंवा अनेक सदस्यांचे एक कुटुंब असावे.
जशी जशी मानवाची उत्क्रांती होत गेली तशी तशी कुटुंबसंस्था आणि तिचे नियमही बदलत गेले असतील. ज्या काळी चाकाचा शोध लागला, ज्या काळी मनुष्य शेती करू लागला तेव्हा वन्य प्राण्यांच्या भीतीने किंवा एखाद्या नैसर्गिक संकटाच्या भीतीने मनुष्य एकत्र राहू लागला असावा. ह्या एकत्रित सहवासामुळे मनुष्याच्या भाव-भावनांचा, विचारांचा, स्वभावाचा आणि एकंदरीतच व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला असेल. मनुष्याचे जीवनमान, राहणीमान, वातावरणाचा त्याच्या वृत्तीवर होत असलेला परिणाम आणि त्यातून त्यांचे वैयक्तिक, सामाजिक, जीवन हे उदयास येऊ लागले असावे. जोपर्यंत मी आणि माझे ह्या भावनांचा उदेक वाढला नव्हता तोपर्यंत मात्र माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत असावा. जेव्हा त्याच्या मनात, विचारात, वृत्ती-प्रवृत्तीत आणि भाव विश्वात “मी’’ डोकावायला लागला तेव्हापासूनच माणसापासून माणूस तुटला असेल आणि माणसाला माणूस जोडावासाही वाटला असेल. मुळांत माणसाला अजूनही माणसाशी जोडता आलेले नाही. ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे मनुष्य जीवनाचा पाया असलेली कुटुंबसंस्था हळूहळू लोप पावायला लागली.
मनुष्याने पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपाला प्राप्त करावे म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधातील काही दशकांची निर्मिती केली असावी. समर्थांच्या साहित्यात ते मनुष्याच्या विकृतीवर, अविवेकीपणावर आणि मनुष्यातील पशुवृत्तीवर घाव घालतात. समुद्रमंथन ज्यावेळी झाले तेव्हा देवांना अमृत मिळाले आणि ते अमर झालेत. पण ह्या संसाररूपी समुद्रमंथनातले अमृत म्हणजेच दासबोध होय! श्री समर्थांनी मानवजातीच्या कल्याणाकरिता लिहिलेला ग्रंथराज दासबोध हा ज्या मानवाने आत्मसात केला त्यास अमृतप्राशनापेक्षाही अधिक सुख प्राप्त करून देऊ शकतो. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात की, “मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!’’
कारण ज्यास कीर्ती मिळते तो/ती केवळ स्वतःपुरता विचार करत नाही तर संपूर्ण विश्वाचा विचार त्याला/तीला करावा लागतो. ह्यातूनच समर्थ नेतृत्वाची निर्मिती होते. संकुचित मनोवृत्ती ही खूप काळ तग धरू शकत नाही. त्यात गती नसते आणि जी विचारसरणी गतिमान नाही त्या विचारसरणीचा अवलंब करणारे अनुयायी हे कधीच प्रगती साधू शकत नाहीत. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मानव जन्म मिळाला, हे आपले सद्भाग्य आहे की आपण हिंदूस्थानात जन्माला आलो आहोत आणि हे आपले महद्भाग्य आहे की श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोध आपल्या कल्याणाकरीता लिहून ठेवला आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत नेतृत्व गुण वाढीस लागते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही बऱयाच काळापर्यंत एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. आजकाल गावा-खेडय़ांमध्येही ही एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात आहे. परंतु, ह्या जागतिकीकरणामुळे एकत्र कुटुंब पद्धतच काय पण कुटुंबसंस्थाही अनेक मोठय़ा शहरात लोप पावत चालली आहे. ह्याचे गंभीर परिणाम पुढील भविष्य काळात आपल्याला सामाजिक स्तरावर भोगायला लागतील की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पुढे होणारे हे सामाजिक स्तरावरील दुःख किंवा हानी जर टाळायची असेल तर दासबोधाच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही.
ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणतात की माणूस कमावणे हीच खरी संपत्ती आहे तीच गोष्ट समर्थांनी दासबोधात लोकसंग्रह करण्यास सांगितली आहे. लोकसंग्रहाची सुरुवात ही कुटुंबापासून व्हायला हवी. जिथे एक विचार आणि एकवाक्मयता असते त्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य हे नेहमीच उत्तम असते. अशा कुटुंबात जन्माला आलेले मूल हे उत्तम नेतृत्व करू शकते. कारण, भव्यदिव्य समाजाचे लहानसे स्वरूप त्याला/तीला बालपणापासूनच अनुभवायला मिळते. दुर्दैवाने आज समाजात हे घडतांना दिसत नाही. कारण, कुटुंबातील प्रत्येकाचेच अहंकार हे कुटुंबापेक्षाही मोठे झाले आहेत. त्यामुळे नेतृत्वाची निर्मिती होताना दिसत नाही. प्रेम, जिव्हाळा, ओलावा ह्या गोष्टींना आपण तिलांजली देत आहोत की काय असे भयानक चित्र निर्माण झाले आहे. ह्यावर उपाय खूप सोपा आहे आणि तो म्हणजे मनोबोधाचा(मनाचे श्लोक) अभ्यास करणे होय!
पूर्वीच्या काळी घरातील चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे आजी-आजोबा असत. आज मात्र क्वचितच घरातील लहान मुलांच्या वाटय़ाला त्यांच्या आजी-आजोबांचे प्रेम येते आहे. पूर्वी मनाचे श्लोक हे घरात म्हणवून घेतले जात असत त्यामुळे बालपणापासूनच मनावर योग्य संस्कार होत असत. त्यातून समर्थ नेतृत्वाची निर्मिती होत होती. आज परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आधी कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतःची मनःस्थिती बदलायला हवी. ज्या कुटुंबात समर्थांच्या श्रीमददासबोध ग्रंथाचा तसेच इतर धार्मिक ग्रंथांचा सातत्याने अभ्यास केला जातोय तेथील सदस्यांची मनःस्थिती बदलू शकते. अशाच कुटुंबात समर्थ नेतृत्वाची निर्मिती होऊ शकते आणि असे नेतृत्व भविष्यातील आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकेल. समर्थांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की, “दुसऱयाच्या दुःखे दुःखवावे! परसंतोषे सुखी व्हावे! प्राणीमात्रांस मेळऊन घ्यावें! बऱया शब्दे!! 07/10/12 ह्याचा अर्थ असा आहे की, दुसऱयाच्या दुःखाने दुःखी व्हावे, दुसऱयाच्या सुखाने सुखी व्हावे. सर्वांना गोड शब्दांनी आपलेसे करवून घ्यावे.
– माधव श्रीकांत किल्लेदार