गौरी आवळे / सातारा :
ज्यांच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे. त्यांच्या शक्तीशी ह्या विश्वात कुणीच बरोबरी करू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यातील कोहिनूर ठरलेल्या संगिता साळुंखे (माई) आहेत. तळागाळातील मुले, महिलांना सक्षम करण्याचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खडतर वाटचाल सुरू ठेवली आहे.
कराड तालुक्यातील किवळच्या संगिता साळुंखे उर्फ माई यांचा जन्म शिरगावात झाला. माईच्या वडिलांचे नाव हणमंतराव मोहिते, आईच नाव शकुंतला आहे. लग्नानंतर माईचे नाव संगिता तानाजी साळुंखे झाले. माईंनी स्त्रिया स्वावलंबी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या बनाव्यात म्हणून साक्षरता व प्रबोधनाचे काम हाती घेतले. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रचनात्मक कार्याचा एक लखलखीत आलेखच सुरू झाला. लेक वाचवा अभियान, स्त्री आरोग्य शिबिरे, महिला बचतगटांची बांधणी, बालवाडय़ांचे निर्माण, शेतीतील विविध प्रयोग जलसंधारणाची कामे तसेच महिलांना तंत्रशिक्षण देऊन व्यवसायभिमुख करण्यासाठी पुरक गृहउद्योग करण्याचे धोरण माई चॅरिटेबल ट्रस्ट करत आहेत. ग्रामीण भागात सामाजिक काम उभे करतानाच त्यांनी मुंबईतही वेगवेगळे उपक्रम राबवले. बी.डी.डी. चाळ, मुंबई येथे महिलांना योग प्रशिक्षण, शासकीय कार्यालयामधील महिलांना, धारावी झोपडपट्टीतील महिलांना योग प्रशिक्षण व समुपदेशन शिबिराचे आयोजन केले. बी.एम.सी स्कूल, सायन येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना एक वर्ष योग प्रशिक्षण दिले. जटा निर्मूलन, मुलींच्या कुस्त्यांचे आयोजन, पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या, नुकसान झालेल्या लोकांना अन्नधान्याची किट पोहचविले. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या झोपडपट्टीतील तरुणांचे समुपदेशन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
माईंच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत. पुण्याच्या संस्कार प्रतिष्ठानने समाजरत्न पुरस्काराने, कराडच्या माऊली प्रतिष्ठानने स्त्राrरत्न पुरस्काराने सन्मानित केले. हुतात्मा बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श महिला पुरस्कार, यशवंतनगरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटात माईंनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना सातारा पोलीस दल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यावतीने कोरोना योद्धा पुरस्कार तर कराड पोलीस दलाच्या वतीने तेजस्विनी पुरस्कार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्त्री रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये माईंनी कष्टकऱ्यांना धान्याची किट पोहोचवली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘कराडची माणुसकी’ गुपच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात योगदान दिले. वडोली निळेश्वर (कराड) येथे विलगीकरण कक्ष सुरू केला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सन्मान केले. सामाजिक कार्यासह त्या राजकारणातही सक्रिय आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या त्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस झाल्या आहेत. पक्षाला बळकटी देण्यासाठी शाखा सुरू करणे, संजय गांधी निराधार योजनेचे काम सुरू आहे. दत्तक योजना, शैक्षणिक पालकत्त्व योजना राबवत आहेत.
समाजाला संदेश देईन…
आजही चूल आणि मूल या विचारात अनेकजण अडकले आहे. स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याची पुरूषी मानसिकता अजून आहे. परंतु महिलांना त्यांचा सूर गवसला आहे. महिलांच्या हातात फुंकणी दिली, त्या फुकंणीला महिलांनी बासरीचे स्वरूप दिले आहे. प्रगतीचा सूर त्यांना गवसला आहे. त्या सुराला समाजाने साथ द्यावी हीच अपेक्षा आहे. आणि हाच संदेश समाजाला देत आहे.
– संगिता साळुंखे (माई)