प्रतिनिधी/कोल्हापूर
महाराष्ट्रासह देशात आणि सबंध जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. हे संकट समाज गांभीर्याने घेणार की नाही? की अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार? असा उद्विग्न सवाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरोना विषाणूने गेली पाच महिने थैमान घातले असून या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस, अंगणवाडी व आशा सेविका, ग्रामीण भागातील योद्धे, खासगी दवाखाने या सर्वांनी अविरत व अविश्रांत मेहनत घेतली. अद्याप हा धोका कधी जाणार याची खात्री नसताना, ते संघर्ष करत आहेत. जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी मला सांगत होते की, रात्रंदिवस आम्हांला झोप नाही. एखादा फोन आला की, पोटात धस्स होते. या सर्वांवर ईतका तणाव आहे. राज्यातील या योध्दाचे कौतुक करत, कोरोनाचा शेवट होईपर्यंत त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे.
या संकटामुळे अनेक संसार उघड्यावर आले. छोटे – छोटे व्यापारी, सलूनवाले, वडाप, रिक्षा, हॉटेल व्यवसायीक, शेतकरी, जिम, मॉल किती कोटी लोक संकटामध्ये सापडेल त्यांना आपण काय मदत करणार ? या रोगामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी बंदी. पतीच्या निधनानंतर पत्नी, मुले, पत्नीच्या निधनानंतर पती, मुले, नातेवाईक उपस्थित राहू शकत नाहीत. यासर्व विचारांऐवजीं गेले दोन आठवडे फक्त एक अभिनेता सुशांतसिग राजपूत यांच्या आत्महत्या विषयीच चर्चा होताना दिसते. आत्महत्या का केली ? कशासाठी केली ? त्याचे किती तरुणींच्यावर प्रेम होते ? तो जीवनात यशस्वी झाला की नाही ? या सगळ्याची चौकशी होईल. त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत.
जेव्हा अमृता वहिनी अवतरतात
कोरोना महामारीबाबत साधे एक अवाक्षरही न काढणाऱ्या आमच्या अमृता वहीनी अवतरतात व एका आत्महत्या तपासावरुन मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात हे आश्चर्यजनक आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची वक्तव्ये, भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहिलेली वाक्ये, मंत्री आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा संबोधणे व आता मुंबई पोलीसावर दाखविलेला अविश्वास. हे सर्व वाचून कोरोनाच्या संकटामध्ये नेमकं हे चाललंय तरी काय ? हेच समजत नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
लढाई संपली नसली तरी अंतिम टप्पा दृष्टिक्षेपात……
रशियाने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधित लस दृष्टिक्षेपात आली असल्याने एक आशेचा किरण दिसत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नुकतीच सिरम इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेस भेट दिल्याची बातमी वाचली. ज्याअर्थी पवार यांनी स्वतः सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली,त्याअर्थी सिरम इन्स्टिट्यूटमधून भारतासह रशिया व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, असा आशावादही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.