उटाची शेतकऱयांच्या वतीने मागणी
प्रतिनिधी /मडगाव
गोव्याच्या ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था ही काजू पीकावर अवलंबून आहे. यंदा काजू पीकासाठी हवामान पौषक असे नसल्याने पीकात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्या काजू 126 रूपये प्रतिकिलो दराने खरेदी केल्या जात आहे. या दरात सरकारने वाढ करावी अशी मागणी उटाच्या वतीने प्रकाश वेळीप यांनी केली आहे.
प्रकाश वेळीप हे आदर्श कृषी संस्थेचे चेअरमन असून दक्षिण गोव्यात आदर्श कृषी संस्था मोठय़ा प्रमाणात काजू खरेदी करण्याचा व्यवसाय करीत आहे. आज शेतकऱयांकडून काजूला वाढीव दर मिळावा अशी मागणी होत असून हीच मागणी आपण उटा संघटणेच्या वतीने सरकारकडे करीत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या चार-पाच वर्षापासून काजूचा दर प्रचंड कोसळलेला आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यातील शेतकरी अडचणीत आलेले आहेत. काजूचे पीक आज काणकोणपासून पेडणे पर्यंत घेतले जात आहे. मात्र, काजू दरावर शेतकरी समाधानी नाही. गेल्या वर्षी सरकारने काजू खरेदीचा दर 125 रूपये प्रतिकिलो निश्चित केलेला होता. तसेच सरकारकडून आधारभूत किंमत दिली जात होती. यंदा सरकारने निश्चित केलेल्या दराची मर्यादा ओलांडली असली तरी हा दर समाधानकारक नाही. त्यात यंदा काजू पीकासाठी पौषक हवामान नसल्याने पीकात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शेतकऱयांना बसणार आहे.त्यामुळे सरकारने काजू दराच्या संदर्भात सहानभूतीपूर्वक विचार करून काजूचा दर फरक वाढवून द्यावा अशी मागणी प्रकाश वेळीप यांनी केली.
काजूचा दर फरक वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये शेतकऱयांच्या आर्थिक उत्पन्नात दुहेरी वाढ करण्याचा संकल्प केलेला आहे. अशावेळी गोव्यातील काजू पीकाकडे देखील केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
काजूची आयात बंद करणे हाच उपाय
आज भारतात आफ्रिका (टांझानिया) मधून मोठय़ा प्रमाणात काजूची आयात केली जात आहे. या काजू केवळ 98 रूपये प्रती किलो दराने आयात केल्या जात असल्याने त्याचा परिणाम स्थानिक काजू पीकावर झालेला आहे. काजूची आयात बंद करणे हाच आत्ता एकमेव पर्याय केंद्र सरकार समोर आहे आणि केंद्र सरकार गांभीर्याने यावर विचार करणार असा आशावाद देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
आज गोव्यातील काजूची स्पर्धा ही इतर देशातील किंवा राज्यातील काजूशी होऊच शकत नाही. गोव्याचा काजू हा रूचकर व स्वादीष्ट असतो. अशी चव असलेला काजू कुठेच उलपब्ध होत नाही. तरी सुद्धा काहीजण गोव्याचा काजू असे भासवून विदेशी किंवा अन्य राज्यातील काजूची विक्री करतात. त्यावर नियंत्रण यायला पाहिजे असे मत प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केले.