स्पर्धात्मक परीक्षार्थींसाठी कोचिंग सेंटर सुरू करण्याचा आमदारांचा विचार
प्रतिनिधी / कारवार
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक केल्यास अपाय निश्चितपणे ठरलेला आहे, असे मत आमदार रुपाली नाईक यांनी व्यक्त केले. त्या येथील सरकारी पदवी महाविद्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या खोल्यांचे आणि महाविद्यालयाच्या 2020-21 वर्षातील विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईल निश्चितपणे वरदान ठरला आहे. तोच मोबाईल शाप ठरू नये याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. विद्यार्थिनींनी केवळ अल्प शिक्षणावर समाधान न मानता उच्च शिक्षणाच्या पाठीमागे लागले पाहिजे, असे केल्यानेच स्वावलंबी जीवन जगता येते स्पष्ट करून आमदार नाईक पुढे म्हणाल्या, समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे शक्य व्हावे, या उदात्त हेतूने सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. विद्यार्थ्यांनी सरकारी कार्यक्रमांचा लाभ उठविला पाहिजे. जेणेकरून शिक्षणावर खर्च करण्यात आलेला पैसा सार्थकी लागेल. येथील विद्यार्थ्यांनी केवळ विश्वविद्यालयीन डिग्रीवर समाधान न मानता आयएएस, आयपीएस आदी स्पर्धात्मक परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे. स्पर्धात्मक परीक्षार्थींसाठी येथे कोचिंग सेंटर सुरू करण्याचा विचार असून तरुणांनी त्या सुविधेचा लाभ उठविण्याचे आवाहन पुढे आमदार नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून कारवार नगराध्यक्ष डॉ. नितीन पोकळे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या डॉ. कल्पना केरवडीकर यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय आदर्श पुरस्कार विजेते अरुणकुमार साळुंके, सी. ए. जगदीश बीरकीडीकर, भाजपचे नेते राजेश नायक, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.