आनंददायी शिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शाळेत उद्यान-मैदानाची खूप मदत होते. कृतीशील शिक्षणाचा पुरस्कार करताना शाळेचा परिसर महत्वाचा ठरतो. आजच्या सिमेंटच्या जंगलात शाळा बंदिस्त असे कोंडवाडे बनल्या आहेत. मात्र या परिस्थितीला स्वातंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या सरकारी शाळा अपवाद आहेत. प्रसन्न आणि आल्हाददायी परिसरच शैक्षणिक संस्कारासाठी महत्वाचा ठरतो. सरकारी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 21 काळी अमराई ही शाळा मुक्त, प्रसन्न वातावरणातील शाळेचे एक उदाहरण आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे बीज रुजवावे या विचारातून 1955 साली काळी अमराई येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा क्र. 21 ची स्थापना करण्यात आली. मातंग कॉलनी येथील लक्ष्मी मंदिरात निवृत्त शिक्षक कै. टी. के. पाटील यांच्या पुढाकारातून शाळेची स्थापना करण्यात आली. पुढे सदर शाळा येथील समाजमंदिरात भरविण्यात येऊ लागली.
1988 -89 पासून समाजमंदिरात शाळा भरु लागली. 2002 -2003 साली कर्नाटक सरकार जिल्हा पंचायत यांच्या सौजन्याने शाळेला स्वतःची इमारत मिळाली आणि शाळा नव्या आव्हानांना सामोरे जात अध्यापन कार्यासाठी कार्यरत झाली.
विलिनीकरणाचा घाट
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करताना शाळा आणि शिक्षकांकडून कशाचीच कमी नव्हती. मात्र शिक्षणाच्या खासगीकरणाची लाट या शाळांच्या मुळाशी उठली. पालकांच्या मानसिकतेमुळे शाळांची पटसंख्या घटली. 60 ते 70 पटसंख्या असणाऱया शाळेची पटसंख्या 1 दशकात पोहचली. परिणामी 2014-2015 साली शाळेच्या विलिनीकरणाचा घाट घालण्यात आला. मात्र अनेक आव्हानांना सामोरे जात प्रगती करत असणाऱया या शाळेने शाळा सुधारणा समिती तसेच शिक्षक यांच्या प्रयत्नातून विलिनीकरणाचा घाट हाणून पडला आणि शाळेने आपले अस्तित्व टिकविले.
नव्या रुपातील आनंददायी शाळा
शाळेत मुलांना आनंद मिळाला पाहिजे आणि मुलांनी हसतखेळत ज्ञानाचे धडे गिरविले पाहिजेत, हा उद्द्sश समोर ठेवत शाळेसमोरील मोकळय़ा जागेचा उपयोग उद्यान निर्मितीसाठी करण्यात आला. 2019 साली शाळेच्या भेवतीने संरक्षक भिंत आणि बगीचा करण्यात आला. माजी नगरसेवक सतीश देवर पाटील यांच्या प्रयत्नातूनच शाळेला उद्यान मिळाले. शाळेच्या समोर वाचनालय, समाजमंदिर सध्या शाळेच्या आवारातच अंगणवाडीसाठी एक वर्गखोली देण्यात आली आहे. अशा वातावरणात निसर्गरम्य मोकळय़ा परिसरात विद्यार्थी अक्षरे गिरवू लागले आहेत. इ. 1 ली ते 5 वी मध्ये 20 च्या घरात विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत.
शाळेचा प्रवास 65 वर्षांचा
ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात आव्हानांना सामोरे जात शाळेने 65 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. सध्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून सरीता पाटील तर कन्नड शिक्षिका म्हणून एस.जी. कुसुगल सेवा बजावत आहेत. शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सविता भारतपुरे व सदस्यांच्या सहकार्यातून शाळेची वाटचाल सुरु आहे. माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली असून कधीतरी शाळेला दिलेली धावती भेटच आठवणीत राहते. देणगीदार राजू पंडित, सतीश देवरपाटील तसेच संस्थांमध्ये इनरव्हील क्लब, न्यू ग्रॅंड हॉटेल व इतर सामाजिक संस्थाचा किंचितसा हातभार प्रगतीसाठी मोलाचा ठरला आहे.
सोयी सुविधांचा पुरवठा
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱया कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देताना सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. यासाठीच शासनातर्फे मोफत सक्तीचे शिक्षण दिले जाते. यामुळे मध्यान्ह आहार, गणवेश, बूट सॉक्स वितरण शासनातर्फे केले जाते. मात्र त्याहीपुढे जाऊन कार्यरत शिक्षक वर्गांनी देणगीदारांच्या मदतीतून बॅग, वहय़ा व इतर शैक्षणिक साहित्य पुरविण्याची व्यवस्था करुन ‘या, शिका आणि मोठे व्हा!’ यासाठीचा प्रयत्न केला आहे.
प्रभारी मुख्याध्यापिका सरीता पाटील
शाळेची स्थापना होऊन 65 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. विलिनीकरणाला विरोध करत शाळेने आपले अस्तित्व कायम राखले आहे. शाळा सध्या प्रगतीकडे वाटचाल करत असून सर्व सोयीसुविधा शाळेत उपलब्ध आहेत. पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असून त्याच वेळी खऱया अर्थाने शाळेला गतवैभव प्राप्त होईल. शाळा सुधारणा कमिटी तसेच माजी नगरसेवक, सहाय्यक शिक्षकांच्या सहकार्यातून शाळा कार्यरत आहे.